पाणथळ नियमांच्या पूर्ततेनंतर कामाला सुरुवात
हरित लवादाच्या आदेशाने बांधकाम थांबवण्यात आलेली वसईच्या सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमी पुन्हा बनविली जाणार आहे. ही दफनभूमी बांधण्यासाठी पालिकेने महाराष्ट्र सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. पाणथळ नियमांची पूर्तता केल्यानंतर दफनभूमीचे काम सुरू केले जाणार आहे.
वसई-विरार महापालिकेने दिवाणमानच्या भूमापन क्रमांक १७६ आणि १६६ मध्ये ११ एकर जागा सर्वधर्मीय दफनभूमीसाठी आरक्षित केली होती. राज्य शासनाकडून २०११ मध्ये ही जागा पालिकेच्या ताब्यात आली होती. दफनभूमीसाठी जागा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे पालिकेने २०१३ मध्ये या जागेवर माती भराव करून भिंत बांधली होती, मात्र या दफनभूमीचे बांधकाम सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप करत हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे हरित लवादाने बांधकाम थांबवून भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. मागील वर्षांपासून या दफनभूमीचे काम रखडले होते.
बांधकाम पुन्हा करायचे असल्यास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेण्याच्या सूचना हरित लवादाने केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला (सीआरझेड-१) मंजुरी मिळाली आहे. या जागेतील पाणथळासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून आवश्यक ती परवानगी मागण्यात आली आहे.
यामुळे आता बंद पडलेल्या दफनभूमीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.पाणथळ नियमांची पूर्तता केल्यानंतर दफनभूमीच्या कामाला सुरुवात होईल, असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
४० लाखांचे नुकसान
या बांधकामात ११ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पालिकेने प्रसिद्धी पत्रकाअन्वये त्याचा इन्कार केला आहे. माती भराव, सर्वेक्षण आणि भिंत बांधण्यासाठी सव्वाचार कोटी रुपयांचा खर्च झाला होता. केवळ भिंत पाडल्याने पालिकेचे ४० लाखांचे नुकसान झाले होते. त्यामुळे भ्रष्टाचार झाला वा पैसे वाया गेले हे आरोप निराधार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.