ठाणे : राज्यात आता महायुतीची दुसरी इनिंग सुरु झाली आहे. नेत्यांच्या निवडणूका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विधानसभेप्रमाणेच जिंकायचा आहेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच महायुती कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाली आहे. अशाचप्रकारे शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्रीरामपुरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय छल्लारे यांच्यासह सरंपच, नगरसेवक, शहर प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राज्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. पूर्वीचे सरकार स्थगिती सरकार होते, पण आपले प्रगती, समृध्दी आणि विकासाचे सरकार आहे. यामुळेच राज्यात महायुतीची दुसरी इनिंग सुरु झाली आहे, असे शिंदे म्हणाले.
अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत असून यामुळे शिवसेना आणखी बळकट होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. यामुळे नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणूका विधानसभे प्रमाणेच जिंकायच्या आहेत, असे आवाहन करत कार्यकर्त्यांच्या पाठीशी महायुती खंबीरपणे उभी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अनेक सुशिक्षीत तरुण आज पक्षात प्रवेश करीत असून त्यांची आज समाजाची आणि काळाची गरज आहे. त्यामुळे अशा तरुणांचे मी पक्षात स्वागत करतो, असेही ते म्हणाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील तरुण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना चार देशांचा दौरा दिला होता. ऑपरेशन सिंदूर, भारताची बाजू मांडण्यासाठी आणि पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा उघडा करण्यासाठी एकूण सहा शिष्टमंडळ परदेशात गेले होते. त्यापैकी एकाचे नेतृत्व खासदार शिंदे यांनी केले होते. त्यांनी चार देशांना भारताला समर्थन देण्याची विनंती केली आणि ती त्या देशांनी मान्य करत भारताला पाठींबा दिला, असे शिंदे म्हणाले.
आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळणारा नेता आहे. मुख्यमंत्री असतांना केलेला विकास, विविध योजना राबविल्या. त्यामुळे मागील निवडणुकीत राज्यात महायुतीला यश मिळाले. यापुढेही असेच काम महायुतीचे सुरु राहणार आहे. आम्ही टिम म्हणून काम केले आता ही आम्ही टीम म्हणून काम करत आहोत. सर्व सामान्यांच्या जीवनात बदल घडला पाहिजे.
शेतकऱ्यांना चांगले दिवस, सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे, असेही ते म्हणाले. आता काम करणारे कोण आणि कामात खोडा घालणारे कोण हे आपण ओळखले आहे. त्यामुळेच आपण खऱ्या शिवसेनेत आला असल्याचेही त्यांनी पक्ष प्रवेश केलेल्यांना संबोधीत केले. लाडकी बहिणीवरुनही विरोधकांनी आगपाखड केली होती. परंतु हा एकनाथ शिंदे जो शब्द देता तो पाळतो. योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. कोणी कितीही अफवा पसरविल्या तरी आम्ही दिलेला वचननामा टप्याटप्याने पुढे नेऊ असा दावा करत प्रिटींग मिस्टेक म्हणणारे आमचे महायुतीचे सरकार नसल्याची टिकाही त्यांनी केली.