Accident, ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर दुचाकीवर निघालेल्या तीन मित्रांचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशाल झुगरे, गणेश झुगरे अशी मृतांची नावे आहेत. तर प्रकाश कवटे या तरुणावर उपचार सुरु आहेत. या अपघाता प्रकरणी भरधाव दुचाकी चालविल्याने गणेश याच्याविरोधात कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहापूर तालुक्यातील कसारा येथील लतिफवाडी परिसरात गणेश, विशाल आणि प्रकाश हे राहत होते. रक्षाबंधनाच्या दिवशी ते एकाच दुचाकीवरून मुंबई नाशिक महामार्गावरील वशाळा पूल येथे जात होते. गणेश झुगरे हा दुचाकी चालवित होता. दरम्यान, वशाळा येथे पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी अडथळे उभारण्यात आले होते. या अडथळ्याला त्यांची दुचाकी धडकली. त्यामुळे तिघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर ते प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचले. परंतु तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपारासाठी इतर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. तिघांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. परंतु गणेश हा गंभीर जखमी झाल्याने त्याची शारिरीक हालचाल थांबू लागल्याचे जाणविताच, त्याला घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर विशाल आणि प्रकाश यांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
अन् मृत्यू झाला…
- घोटी रुग्णालयात गणेश याला डाॅक्टरांनी तपासले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर विशाल याला रुग्णालयात दाखल केले असता, त्याचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. प्रकाश गंभीर जखमी असून त्याच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरु होते.
मृत्यूनंतर गणेशवर गुन्हा दाखल - या अपघाताप्रकरणी गणेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश याने भरधाव दुचाकी चालविल्याने हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, कसारा पोलीस ठाण्यात गणेश विरोधात मोटर वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८२ प्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल झाला आहे.