अंबरनाथ : अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या हद्दीत नाळिंबीच्या डोंगरावर गेल्या आठवड्यात एक शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या मृतदेहाचे शीर आठवडाभरानंतरही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. तसेच आरोपींचा शोधही लागला नसल्याने पोलिसांसमोर शीर शोधण्याचे मोठे आव्हान आहे.

अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेली तीन झाडी परिसर हा तसा शहरापासून दूर आणि शांत परिसर. मात्र गेल्या काही वर्षात अनैतिक, गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी या परिसराचा वापर वाढला आहे. अंबरनाथ शहरातून कल्याणच्या नाळिंबी गावाकडे जात असताना पुढे डोंगर परिसर लागतो. याच भागात अनेक पर्यटकही येऊन फेरफटका मारत असतात. या ठिकाणी एका वळणावर गेल्या आठवड्यात एक शीर नसलेला मृतदेह आढळला होता.

या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र शीर नसल्याने मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी नाळिंबी आणि परिसरातील संपूर्ण डोंगराचा परिसर पिंजून काढला. शीर शोधण्यासाठी मानवी मर्यादा आल्यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून शीर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही शीर मिळाले नाही. पोलिसांनी मृतदेहाच्या हाताच्या बोटाच्या ठशांचा वापरही करून पाहिला. या व्यक्तीवर एखादा गुन्हा दाखल आहे का तेही शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातूनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी अंबरनाथ, कल्याण, तालुक्यातील सर्व हॉटेल्स, लॉज, शेतधरे यांच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही या व्यक्तीची ओळख मिळते का हे तपासले. मात्र व्यक्तीची ओळख अजूनही पटू शकलेली नाही. मृत व्यक्तीची ओळख कळण्यासाठी त्याचे शीर ही सर्वात महत्वाचा पुरावा आहे. मात्र तेच हाती लागत नसल्याने पोलिसांच्या तपासाला दिशा मिळताना दिसत नाही. अशा कोणत्या व्यक्तीची हरवल्याची तक्रारही दाखल झाली नसल्याची बाब समोर आली आहे.मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पोलिसांकडून केला जात असून तपास सुरू आहे, अशी माहिती कल्याण ग्रामीणचे पोलीस निरिक्षक सुरेश कदम यांनी दिली आहे.