डोंबिवली : मध्य रेल्वे मार्गावर मुंबईहून कल्याणच्या दिशेला जाणारी लोकल वाहतूक गुरूवारी दुपारी गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान जलद मार्गावर धावणाऱ्या एका लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू करून दुरूस्ती केली. तोपर्यंत जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावरती वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या डोंबिवली, दिवा कल्याण रेल्वे स्थानक भागात रांगा लागल्या होत्या.

कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. मुंबईहून कल्याण आणि कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. या तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अनिश्चित वेळेत धावत होती. मुंबईहून कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणारी वाहतुक काही काळ खोळंबली होती. मुंबईकडे जाणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या जागोजागी खोळंबल्या होत्या.

हेही वाचा : भिवंडीत कपिल पाटील यांना कट्टर विरोधक सुरेश म्हात्रे यांचे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुपारच्या सुमारास मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावर कल्याण ते ठाकुर्ली स्थानकादरम्यान लोकलच्या पेंटाग्राफमध्ये अचानक बिघाड झाल्याने या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाने तंत्रज्ञांच्या साह्याने पेंटाग्राफच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. युद्धपातळीवर काम सुरू करण्याआधी दुसऱ्या इंजिनच्या साह्याने ही लोकल हटविण्याचे काम सुरू केले. अनेक चाकरमान्यांनी रेल्वे मार्गावर उतरून पायपीट करत इच्छित स्थळ गाठले. संध्याकाळी बिघाड दुरूस्त केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. उन्हाच्या त्रासामुळे प्रवासी त्रस्त झाले होते. मधल्या दोन-तीन तासांच्या कालावधीत लोकल प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवासी देखिल बेजार झाले होते.