भगवान मंडलिक

कल्याण: मुंबई-नाशिक-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहापूर वाहतूक पोलीस ठाणे हद्दीत गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत १११ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या अपघातामध्ये ८३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वाहन गती नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७८ हजार घटना गेल्या दोन वर्षात घडल्या असून, या वाहन चालक, मालकांकडून एकूण नऊ कोटी ७४ लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वाधिक वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील वाढते अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विशेष उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रृतगती महामार्गावरील वाहनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सुविधांप्रमाणे मुंबई-आग्रा महामार्गावर तशा सुविधा नसल्याने त्याचा गैरफायदा घेऊन वाहन चालक प्रमाणित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवितात. त्यातून अपघात घडतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> ठाकरे गटाला धक्का, कल्याण मध्ये ठाकरे समर्थक शिंदे गटात सामील

वाहन रस्त्याने धावत असताना त्याच्या वाहन गतीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा महामार्गावर असेल तर चालक त्या नियंत्रकाच्या भीतीने वाहन प्रमाणित गतीने चालवितात. मुंबई-आग्रा महामार्गावर ही सुविधा नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे, असे अधिकारी म्हणाला. सन २०२१-२०२२ मध्ये अपघाताच्या एकूण अनुक्रमे ६८, ३२ घटना घडल्या. या अपघातात अनुक्रमे ५१, ३२ मृत्यू झाले. वाहने वेगाने चालवून गतीचे नियम उल्लंघन करणाऱ्या २०२१ मध्ये ६३ हजार १७८, २०२२ मध्ये १४ हजार ६०९ घटना घडल्या आहेत. या वाहन चालकांकडून २०२१ मध्ये सात कोटी ३५ लाख ४९ हजार रुपये आणि गेल्या वर्षी दोन कोटी ३८ लाख ८१ हजार रुपये दंड वाहतूक विभागाने ई चलान, स्थित दर्शक पध्दतीने वसूल केला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानालगतच्या इमारतीतील १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

रस्ते वाहतुकीवर भर

उत्तर भारतामधून महाराष्ट्रात येणारी वाहने मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गाने येजा करतात. राज्यातील वाहने याच महामार्गाने उत्तरेत जातात. मध्यम उद्योजकांचा बहुतांशी भर रस्ते मार्गाने तयार माल पाठविणे, कच्चा माल मागविणाऱ्यावर आहे. त्यामुळे माल वाहतुकीच्या विविध पर्याय उपलब्ध असले तरी अनेक व्यावसायिक रस्ते मार्गाने वाहतुकीला प्राधन्य देत आहेत, असे रस्ते वाहतूक तज्ज्ञाने सांगितले. वाहनातील माल वेळेत इच्छित स्थळी पोहचणे आवश्यक असल्याने आणि अलीकडे वाहतूकदाराने कंपनीकडून चलन घेतले की ते विहित वेळेत पोहचले पाहिजे अन्यथा काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात. वेळेत इच्छित पोहचण्याच्या धावपळीत चालकाकडून अनेक वेळा भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात होत आहेत, असे वाहतूक अधिकारी म्हणाला.

हेही वाचा >>> डोंबिवलीत एटीएम कार्डची अदलाबदल करुन २५ हजार रुपयांची फसवणूक

अपघात नियंत्रण यंत्रणा

मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील वाढते अपघात विचारात घेऊन राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाने रस्ता सीमा रेषा पट्टे सफेद रंगाने मारणे, चौक, चौफुल्यांवर मार्गिका दर्शविणे. मार्गिकांवर बाण दाखवून इच्छित मार्ग दाखविणे, रात्रीच्या वेळेत वाहने धावत असताना अपघात प्रवण क्षेत्र, वळण रस्ता दूरवरुन निदर्शनास यावा म्हणून दूरदर्शी तेजस्वी इशारा खूण बसविण्याची कामे तातडीने हाती घेतली आहेत. गतिरोधकावर पांढरे पट्टे मारणे, महामार्गा लगतच्या पोहच रस्त्यांवर वाहनांची गती कमी राहील अशी यंत्रणा बसविण्याची कामे सुरू केली आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऱ्याच्या (एनआचआय) अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील वाहनांची संख्या वाढत आहे. रस्ते वाहतूक वाढली आहे. नाशिक, शिर्डीकडे जाणाऱ्या भक्तांचा ओघ वाढत आहे. वाढत्या वाहन संख्येेची गती आणि अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना इतर महामार्गांप्रमाणे या महामार्गावर होणे आवश्यक आहे. तशी कामे आता ‘एनआचआय’कडून सूरू आहेत.”

-भरत उबाळे, सामाजिक कार्यकर्ते शहापूर