Congress / ठाणे : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये,”बाळासाहेब थोरात, आम्हाला देखील नथुराम गोडसे व्हावं लागेल हा… असे कीर्तनकार संग्राम भंडारे म्हणत आहेत. या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. आव्हाड यांनी एक ट्विट करत थोरात यांच्या पाठीशी सदैव असल्याचे म्हटले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांचा एक व्हिडीओ व्हायरल करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे टीका केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र संतांची भूमी आहे.

संतांच्या वाणीने हा समाज जागृत झाला आणि पुरोगामी विचारांनी आपली परंपरा या मातीत मजबूत केली. पण आज संग्राम भंडारे सारखे तथाकथित कीर्तनकार महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा अपमान करून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना,”बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आम्हाला देखील नथुराम गोडसे व्हावं लागेल हा..!” असे म्हणत थेट जीवे मारण्याची धमकी देत आहेत. गोडसे प्रवृत्तीची ही भाषा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. संत परंपरेतून मानवतेचा धर्म शिकवला जातो, द्वेषाची भाषा नाही. बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्या कार्याचा विरोधकांनीही नेहमी आदर केला आहे. त्यांना धमकी देणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आव्हान आहे असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार) खंबीरपणे उभा

आव्हाड यांनी या ट्विटमध्ये भाजपवर टीका केली. भाजपच्या राजकीय डावात, धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात कलह निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न सुरू आहे. पण हा डाव राज्यातील वारकरी, पुरोगामी विचारवंत आणि सर्वसामान्य जनता उधळून लावेल, याची मला खात्री आहे. महाराष्ट्राची संत परंपरा ही प्रेम, सत्य आणि अहिंसेवर आधारलेली आहे. आम्ही गोडसे प्रवृत्तीचा निषेध करतो आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (शरद पवार) खंबीरपणे उभे आहोत,असा शब्द देतो असेही आव्हाड म्हणाले.