Manoj Jarange Patil Mumbai Protest: ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ठाणे आणि कल्याणमधील मराठा बांधव पुढे सरसावला आहे. मराठा आंदोलकांसाठी ठाण्याच्या घराघरातून चटणी, भाजी, भाकर तर, कल्याणमधील मराठा समाजाने मुंबईत अन्नछत्र सुरू केले आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मराठा मंडळाच्या सभागृहात महत्वाची बैठक पार पडली होती. यात आंदोलनासाठी येणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांच्या भोजन, पाणी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच समाजातील अनेक नेत्यांकडून मागील काही दिवसांपासून विभागनिहाय बैठका घेऊन अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. ठाणेकर मराठा समाजही यात मागे राहू नये म्हणून एकदिलाने पुढे सरसावत आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ठाणे शहरातून आणि नाशिकमार्गे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी आनंदनगर चेक नाका येथे नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली होती. ती व्यवस्था आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही कायम आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. यात मराठवाडा आणि विदर्भ मधील मराठा आंदोलकांचा सहभाग सर्वात जास्त आहे. या भागातील मराठा बांधव हे ठाण्याच्या माजीवडा मानपाडा आणि विटावा या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या भागातील घराघरातून आंदोलकांसाठी चटणी, भाजी, भाकर देण्यात येत आहे. हे जेवण घराघरातून गोळा करून ते मुंबईतील आंदोलकांपर्यंत पोहचविण्याचे काम मराठा समाजाचे कार्यकर्ते करत आहेत, अशी माहिती मराठा समाजाचे पदाधिकारी दत्ता चव्हाण यांनी सांगितले.
मुंबईत अन्नछत्र
कल्याणमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारपासून मुंबईत अन्नछत्र सुरू केले आहे. कल्याणच्या बाजारातून भाजीपाला तसेच इतर साहित्य मुंबईत सकाळी नेण्यात येते आणि तिथेच जेवण बनवून मराठा आंदोलकांना देण्यात येत आहे. पावसामुळे अन्नछत्रसाठी मुंबई तात्पुरती शेड उभारण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
ठाण्याच्या या भागातून फळ, बिस्कीट, पाणी पुरवठा
ठाणे शहराच्या वागळे स्टेट परिसरात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या भागातून मुंबईतील मराठा आंदोलकांना फळ, बिस्कीट आणि पाणी असा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच कोकण भागातील मराठा बांधव हे गणेशोत्सवासाठी गावी गेले आहेत. मात्र पाच दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर ते मुंबईत परतून आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.