कल्याण : मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावरून प्रवास करताना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पाच बोगदे आहेत. एक बोगदा आठ किलोमीटर लांबीचा आहे. या बोगद्यांमधून प्रवास करत असताना मोबाईलवरून बोलत असताना प्रवाशांचे संभाषण मोबाईल जाळ्या (नेटवर्क) अभावी अचानक खंडित (डिसकनेक्ट) होत होते. प्रवाशांची ही अडचण विचारात घेऊन बोगद्यांमध्ये आणि महामार्गावर कोणत्याही भागात मोबाईल सुरू राहावेत यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या बोगद्यांच्या बाहेर आणि महामार्गाच्या अन्य भागात मोबाईल मनोरे आणि बोगद्यांमध्ये आवश्यक मोबाईल जाळे उभारणीचा निर्णय घेतला आहे.

शहापूर तालुक्यातील समृध्दी महामार्गाचा भाग हा १२ किलोमीटर लांबीच्या कसारा घाट डोंगर रांगांमधून गेला आहे. या घाट मार्गावरील शहापूर ते इगतपुरी डोंगर रांगांमध्ये सर्वाधिक बोगदे आहेत. खर्डी गाव परिसरातील फुगाळे ते वाशाळा गाव हद्दीतील डोंगर रांगांमधील आठ किलोमीटरचा बोगदा हा या महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी समृध्दी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे (भिवंडी) या ७६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले.

मुंबई ते नागपूर राज्याच्या नऊ जिल्ह्यांमधून गेलेल्या समृध्दी महामार्गाला तालुका, जिल्ह्याप्रमाणे महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी बाह्यवळणे आहेत. कमी वेळात सुसाट वेगाने प्रवास करण्यासाठी नागरिक या महामार्गाला पसंती देत आहेत.

प्रवासात बहुतांशी प्रवासी मोबाईलवर संभाषण सुरू करतात. हे प्रवासी ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील डोंगर रांगांमध्ये, कसारा, इगतपुरी घाट मार्गावरील बोगद्यांमधून जात असताना काही ठिकाणी, बोगद्यांमध्ये मोबाईलवरील मोबाईल जाळ्यांअभावी खंडित (डिसकनेक्ट) होत होते. समृध्दीवरील बोगद्यांमध्ये वाहन गेल्यावर मोबाईलचे जाळे (नेटवर्क) गायब होत होते. याविषयी अनेक जागरूक प्रवाशांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

प्रवाशांच्या सूचनांची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाने शहापूर तालुक्यातील समृध्दीच्या बोगदे असलेल्या भागात, महामार्गावर ज्याठिकाणी मोबाईल जाळ्याच्या अडचणी आहेत तेथे मोबाईल मनोरे उभारणीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूर, कसारा, इगतपुरी परिसरातील पाचही बोगद्यांमधून जात असताना प्रवाशांना मोबाईल खंडित होण्याचा अनुभव येऊ नये यासाठी बोगद्यांमध्ये ठराविक अंतराने राऊटर, कनेक्टर बसविण्यात येणार आहेत. लिकी केबल्सच्या माध्यमातून बिनतारी संदेशवहन यंत्रणा बोगद्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. राऊटरला रेंज येण्यासाठी एक्सटेंडर, बुस्टर सुविधा बसविण्यात येणार आहे, असे एमएमआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहापूर, कसारा, इगतपुरी डोंगर भागातील बोगद्यांमधून प्रवास करताना समृध्दी महामार्गावर या भागात मोबाईलचे जाळे नसल्याने मोबाईल खंडित होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. या महामार्गावरील बोगदे आणि जेथे मोबाईलचे जाळे नाही तेथे मोबाईलचे जाळे उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना समृध्दीवरून प्रवास करताना मोबाईल खंडित होण्याची समस्या जाणवणार नाही. – अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी.