Mumbra Thane Train Accident : काही काळ घाम येत होता म्हणून केतन दारात गेला, पण दिव्यात लोकल गाडीत मोठी गर्दी झाली. दिव्यावरून गाडी निघाली आणि मुंब्र्याजवळ येताच बाजूने एक लोकल जोरात गेली. लोकलमधल्या कुणाचीतरी बॅग लागली आणि केतन पडला. आम्ही साखळी ओढून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. पण लोकल ठाणे स्थानकातच थांबली. तिथे काही जणांना लागलं होत, अशी माहिती मुंब्रा अपघातात मृत्यू पावलेल्या उल्हासनगरच्या केतन सरोज या तरूणाच्या मित्राने अर्थात दिपक शिरसाठ याने सांगितली. केतन आणि दिपक रोज शहाड स्थानकातून लोकल पकडून ठाण्यापर्यंत प्रवास करायचे.
मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातात मृत्यू झालेला केतन सरोज हा २३ वर्षीय तरूण उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात तानाजी नगर परिसरात वास्तव्यास होता. केतन आपल्या आई वडिल आणि दोन लहान भावंडांसह राहायचा. घरची परिस्थिती बेताची होती. पण केतनने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. काही महिन्यांपूर्वीच त्याला ठाण्यात वागळे इस्टेट येथील कंपनीत नोकरी लागली होती. केतनचे वडील दिलीप सरोज हे विद्युत वस्तूंचे किरकोळ दुरूस्तीचे काम करत होते. केतनचे दोन भाऊ शिक्षण घेत असल्याने त्यांच्या कुटुंबाची मोठी जबाबदारी केतनवर होती अशी माहिती त्यांचे शेजारी राजेंद्र शिरसाठ यांनी दिली आहे.
माझा मुलगा दिपक आणि केतन सोबतच शहाड रेल्वे स्थानकातून दररोज लोकल पकडत होते. दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले. त्यामुळे केतनच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे, असेही राजेंद्र शिरसाठ यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. अपघातानंतर आम्ही तात्काळ कळव्याच्या रूग्णालयात धाव घेतील. दिपकने सांगितले की केतन आणि तो सोबतच होते. मात्र घाम येत होता आणि गरम होत असल्याने केतन लोकलच्या दरवाज्याकडे गेला, असेही राजेंद्र शिरसाठ म्हणाले.
शहाड स्थानकात लोकलमध्ये जास्त गर्दी नसते. कल्याण स्थानकात लोकल काहीशी रिकामी होते. मात्र आज दिवा स्थानकात लोकल थांबल्यानंतर त्यात मोठी गर्दी झाली. त्यामुळे लोकलच्या दरवाज्यावर असलेल्या प्रवाशांवरही भार होता. दिवा स्थानकातून लोकल निघाल्यानंतर तीला वेग होता. त्याचवेळी मुंब्रा स्थानकाजवळून लोकल जात असताना शेजारून वेगाने एक लोकल गेली. त्या लोकलमध्येही गर्दी होती. त्या गर्दीतल्या कोणत्या तरी प्रवाशाची बॅग किंवा काहीतरी लागले. त्यामुळे अनेक डब्यातले अनेक जण गाडीतून पडले, अशी माहिती दिपक शिरसाठ यांने दिली.
या अपघातामुळे सरोज कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. उल्हासनगरच्या तानाजी नगर परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.