ठाणे- शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाला २० ते २५ रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीण आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे ही रुग्ण वाढ रोखण्यासाठी आरोग्य विभाग सर्तक झाला असून करोना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. तसेच जे लाभार्थी नागरिक अद्यापही लसीकरणापासून वंचीत आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा मिशन हर घर दस्तक अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील दोन ते तीन आठवड्यांपासून करोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांचा आकडा चारशे पार झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण जरी शहरी भागातील असले तरी, ग्रामीण भागातही करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात दिवसाला २० ते २५ रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात आढळून येत असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे कल्याण तालुक्यातील निळजे भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ग्रामीण भागातील ८० सक्रिय रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे हे रुग्ण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. केवळ दोनच रुग्णांवर पालिकेच्या करोना केंद्रांवर उपचार सुरु आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाअधिक असल्यामुळे अद्याप तरी, करोना काळजी केंद्र सुरु करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतलेला नाही. असे असले तरी ही रुग्णवाढ रोखण्यासाठी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेकडून करोना चाचण्या आणि लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ग्रामीण भागात दिवसाला ९० ते १०० जणांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. परंतू, आता पुन्हा करोना प्रादूर्भाव वाढू लागल्यामुळे या चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या दिवसाला १५० ते २०० चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच पुढील काही दिवसात या चाचण्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागात अद्यापही अनेक नागरिक असे आहेत की, त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. या नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी मिशन हर घर दस्तक अभियानाची दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन करोना लसीकरणाच्या वंचित लाभार्थ्यांचा शोध घेणार आहेत. असे नागरिक आढळून आल्यास त्यांचे जवळच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण सत्र प्रमुख डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.
ग्रामीण भागातील करोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीपासून ज्या योजना राबविण्यात येत होत्या. त्या सर्व योजना आताही राबविण्यात येत आहेत. आता, आढळून येत असलेल्या रुग्णांमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. परंतू, तरीही करोना चाचणी आणि लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे.
– डॉ. भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, ठाणे.
तालुका निहाय उपचाराखाली असलेले रुग्ण
तालुका रुग्ण
अंबरनाथ ०
कल्याण ६८
भिवंडी ७
शहापूर ३
मुरबाड २
एकूण ८०