ठाणे – लहान बालकांचे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या घडणारे पहिले टप्पे म्हणजे अंगणवाड्या. मात्र याच अंगणवाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या एका अहवालानुसार ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या एकूण ३ हजार ५३८ अंगणवाड्यांपैकी ६०२ अंगणवाड्यांमध्ये शौचालय नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पायाभूत सुविधा नसल्याने लहान बालकांसह अंगणवाडी सेविकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण आणि आरोग्यस्थिती सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य महिला बाल विकास विभाग विविध उपाययोजना राबवित असते. ग्रामीण आणि शहरी भागात या सर्व योजना एकाच ठिकाणाहून राबविण्यासाठी अंगणवाडी उभारण्यात आल्या आहेत. या अंगणवाडींमध्ये कार्यरत असणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देण्याबरोबरच दररोज पोषण आहाराचे वाटप केले जाते.
अंगणवाडी उपक्रम बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या ठिकाणी ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालक या अंगणवाड्यांमध्ये येतात. बालकांना येथे पोषण आहार, प्राथमिक शिक्षण आणि सामाजिक सवलती दिल्या जातात. मात्र शौचालय नसल्यामुळे बालकांना लघवी अथवा शौचासाठी उघड्यावर किंवा जवळच्या झाडाझुडपांत जावे लागते. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात उष्णता आणि अनेक वेळा धोकादायक परिस्थितीत जावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्वचारोग, जंत संसर्ग, पोटाचे विकार यासारख्या समस्यांनी मुलांना सतत त्रास सहन करावा लागतो. विशेषतः मुलींना याचा अधिक फटका बसतो. स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबी कमी पडत असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना अंगणवाड्यांमध्ये पाठवण्यास टाळाटाळ करतात.
फक्त बालकच नव्हे तर अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस महिलांना देखील शौचालयाच्या अभावामुळे दररोज त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. शौचासाठी अंगणवाडीपासून लांब जावे लागते, जे महिला सेविकांसाठी सुरक्षितही नसते. काही ठिकाणी शाळा अथवा इतर सरकारी इमारतींच्या शौचालयांचा उपयोग केला जातो, पण तीही सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही. परिणामी या महिला आपल्या आरोग्याबाबत तडजोड करत आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
‘स्वच्छ भारत अभियान’, ‘सर्व शिक्षा अभियान’ आणि ‘बाल विकास प्रकल्प’ या सर्व योजना कागदावर दिसतात. परंतु या योजनेचा प्रत्यक्ष परिणाम दिसत नाही. तर अनेक अंगणवाड्या आजही जीर्ण इमारतीत, मर्यादित जागेत आणि सुविधाशून्य अवस्थेत सुरू आहेत. या स्थितीमुळे बालकांचे आरोग्य आणि शिक्षण यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे. शासन आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
कुठे किती अंगणवाड्या ?
ठाणे – १ हजार ६३
भिवंडी – ७८०
शहापूर – ५७७
कल्याण – ३९९
उल्हासनगर – २१७
अंबरनाथ – १०९
मुरबाड – ३९३
एकूण ३ हजार ५३८ अंगणवाड्यांमध्ये ३ हजार ३३१ सेविका कार्यरत आहेत.