ठाणे – मुंबईकडे येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा ठाणे ते बदलापूर आणि कसारा दरम्यानचा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरत आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात, फक्त रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या गाडीतून पडून ६६३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. रेल्वेच्या सुविधांचा अभाव, प्रलंबित प्रकल्प आणि अपुरी रस्ते सेवा यामुळे नागरिक रेल्वेवरच अवलंबून आहेत. त्यामुळेच रुळ ओलांडण्याचे धाडस किंवा गर्दीमुळे गाडीतून पडण्याचे प्रकार वाढले आहेत.
आपल्या दैनंदिन कामासाठी मध्य रेल्वेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झालेली प्रवासी संख्येत वाढ आणि त्या तुलनेत कमी पडत असलेल्या लोकल गाड्यांची संख्या यामुळे प्रवाशांना रोज जीवघेण्या गर्दीचा सामना करून प्रवास करावा लागतो. यामुळे दररोज हजारो प्रवासी अक्षरशः लोकल गाडयांच्या दरवाज्यांना लटकून प्रवास करतात. यामुळे नियमित लोकल गाड्यांमधून पडून अपघाताची अनेक प्रकरणे समोर येतात. तर यातील मृत्यूंची संख्या देखील लक्षणीय असते. याच पद्धतीने १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात फक्त रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या गाडीतून पडून ६६३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. रेल्वेची वाढती गर्दी, अपुरी पायाभूत सुविधा, आणि नागरिकांची घाईगर्दी या सगळ्यांचे मिळून हे दाहक वास्तव समोर येत आहे. हा जीवघेणा प्रवास आता केवळ मुंबई गाठण्यासाठी नाही, तर सुरक्षितता अबाधित ठेवण्याचे आव्हानही झाला आहे.
अपघातांची पोलीस नोंद कुठे ?
- ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे : ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, ऐरोली
- डोंबिवली पोलीस ठाणे : कोपर, डोंबिवली, ठाकूर्ली, भिवंडी, खारबाव, कामनरोड, जुचंद्र
- कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे : कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा या सर्व भागांतील अपघातांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांत झाली आहे. तर एकूण ६६३ जणांपैकी ३९१ मृत्यू रुळ ओलांडताना तर २७२ मृत्यू धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे झाले.
पुरुषांची संख्या अधिक
अपघातांमध्ये पुरुष प्रवाशांचे प्रमाण अधिक असून, केवळ २०२४ या वर्षात ठाणे हद्दीत १४० पुरुषांचा मृत्यू झाला. डोंबिवलीत ५१ पुरुष तर कल्याणमध्ये तब्बल ९१ पुरुष अपघातात मृत्युमुखी पडले. महिला मृत्यूंची संख्या तुलनेने कमी असून ठाण्यात ११, डोंबिवलीत ३ आणि कल्याणमध्ये ३ महिलांचा मृत्यू झाला.
अपघात कुठे किती
- १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ (मृत्यू )
पोलीस ठाणे – रेल्वे रुळ ओलांडणे- धावत्या रेल्वेतून पडून
ठाणे – १५१- ६८
डोंबिवली- ५४- ३९
कल्याण – १०४- ११६
- १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ (मृत्यू)
पोलीस ठाणे – रेल्वे रुळ ओलांडणे- धावत्या रेल्वेतून पडून
ठाणे – ४४- १४
डोंबिवली- १४- ०७
कल्याण – २४- २८