ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला असतानाच, या घटनेनंतर मनसेने मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे स्थानक परिसरात धडक मोर्चा काढला. यावेळी मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासना विरोधात घोषणा बाजी केली.
मुंब्रा – दिवा स्थानका दरम्यान असलेल्या ज्या वळणावर अपघात झाला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेच्या एका कार्यकर्त्याने रेल्वे प्रशासनाला केली होती.या अपघातात त्या मुलाला पाय गमवावे लागले असल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. रेल्वे प्रशासनच्या या निष्काळजीपणा विरोधात मनसेने मंगळवारी रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला.ठाण्यातील गावदेवी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. मोठया संख्येने मनसैनिक या मोर्च्यात सहभागी झाले आहेत.
रोज प्रवासी मरे, सोयर सुतक आहे का, प्रशासन कोडगे, सरकार निष्क्रिय प्रवाशांना कोण वाली , त्याची झोळी सदाखाली, दरोजचा प्रवास न ठरो शेवटचा श्वास,मृताना न्याय द्या, दोषींना शिक्षा, या निष्काळजी रेल्वे प्रशासनाचे करायचे काय अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानक परिसरात घोषणा बाजी केली. या मोर्च्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.