ठाणे : दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थपनांनी आपल्याच आवाराच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अशा गृहसंकुलांचा शोध घेण्याबरोबरच शहरातील हॉटेल, मॉल वाणिज्य आस्थापनांना अशा एकूण ७० जणांना नोटीसा बजावल्या आहेत. यात कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा असा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेली तसेच दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थापनांना कचरा विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी घेतला होता. या निर्णयानुसार पालिका प्रशासनाने गृहसंकुल आणि आस्थापनांना नोटिसा पाठविल्या होत्या. या निर्णयास गृहसंकुलांनी विरोध केल्याने वाद रंगला होता. राजकीय मध्यस्थीनंतर पालिकेने पुढे काहीच केले नव्हते. दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात सी पी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्र बंद केल्यानंतर विभागवार कचरा हस्तांतरण केंद्र उभारण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यासही नागरिकांनी विरोध केला होता. अखेर पालिकेने आता घनकचरा अधिनियम २०१६ ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून यानुसार दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थपनांनी आपल्याच आवाराच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अशा गृहसंकुलांचा शोध घेण्याबरोबरच शहरातील हॉटेल, मॉल वाणिज्य आस्थापनांना अशा एकूण ७० जणांना नोटीसा बजावल्या आहेत. यात कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा असा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात कचरा विल्हेवाटीसाठी यंत्रणा बसविण्यात आल्याचे दाखवून इमारतीचे रहिवास वापर प्रमाणपत्र मिळविण्यात आले आहे. त्यामुळे अशा इमारतींचा शोध घेऊन त्याठिकाणी कचरा प्रकल्प सुरू आहे की नाही याची चाचपणी पालिका करणार आहे. तर, शहरातील हॉटेल, मॉल वाणिज्य आस्थापनांमध्ये कचरा विल्हेवाट लावली जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली असून अशा ७० अस्थापनांना नोटीसा बजावून कचरा विल्हेवाट लावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा असा इशारा देण्यात आला आहे.
ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करण्याचे काम ठाणे महापालिका स्वत: पासून सुरू करणार आहे. येत्या काही दिवसात पालिका मुख्यालय इमारतीमधील उपहारगृहातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारला जाणार असून या प्रकल्पातून तयार होणारे खत उद्यानांसाठी वापरले जाणार आहे, अशी माहीती घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच ७० आस्थापनांना नोटीसा बजावल्याच्या वृत्तासही त्यांनी दुजोरा दिला.