ठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, ठाण्यातील ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यांने तीन हात नाका चौकात भला मोठा बॅनर लावला आहे. “देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाहीत, असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला असून हा वादग्रस्त बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाय, दोन मराठी वाघ एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे”, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहे. या निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये पक्ष प्रवेशाची चढाओढ सुरू आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. या दोन्ही पक्षाचे नेते एकत्रितपणे आंदोलन करू लागले असून याचे चित्र कल्याण डोंबिवली शहरात दिसून आले. तसेच गेल्या काही दिवसात या पक्षाचे कार्यकर्ते अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. असे असतानाच,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी तुषार रसाळ यांनी तीन हात नाका चौकात भला मोठा बॅनर लावला असून हा बॅनर शहरात चर्चेचा विषय बनला आहे. ठाण्यातील तीन हात नाका परिसरात तुषार रसाळ यांनी लावलेल्या एका वादग्रस्त बॅनरने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. “देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाहीत. मी, दिवंगत दिलीप पंढरीनाथ रसाळ यांचा मुलगा तुषार दिलीप रसाळ असा मजकूर बॅनरवर आहे. हा मजकूर भाजप नेते नितेश राणे यांना लक्ष्य करणारा असल्याचे बोलले जात आहे. “दोन मराठी वाघ एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे” असे सांगत त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी साद घातली आहे. या बॅनरमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.