अंबरनाथ – एकीकडे ठाणे जिल्ह्यातील अरूंद उड्डाणपूल कोंडीचे कारण ठरत असताना महत्वाच्या रस्त्यांवरही कोंडी होते आहे. त्यातच महामार्ग किंवा राज्यमार्गांना जोडणाऱ्या जोड रस्त्यांना पडलेले खड्डे आणि तेथे साचणारे पाणी आता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. काटई – अंबरनाथ, खोणी – तळोजा या मार्गांवरचे जोडरस्ते यांना पडलेले खड्डे त्रादायक ठरत आहेत. खड्ड्यात दणके लागल्याशिवाय महामार्गांचा प्रवास होत नसल्याने वाहनचालकांत संताप आहे.
गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात कोंडी वाढलेली आहे. डांबरी रस्त्यांना पडलेले खड्डे, अरूंद उड्डाणपूल, उड्डाणपुलांना पडलेले खड्डे, अवजड वाहतूक अशा सर्व कारणांमुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे कल्याण शहराच्या प्रवेश द्वारावर असलेल्या उड्डाणपुलांवर अवजड वाहतूकीला निर्बंध घालून कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दुसरीकडे महामार्ग किंवा राज्य मार्ग म्हणून दर्जा असलेल्या रस्त्यांवरही काही वेगळी स्थिती नाही. या राज्य मार्गांवर प्रवेश करण्यापूर्वी खड्ड्यातून प्रवास करावा लागतो अशी स्थिती आहे. काटई – अंबरनाथ रस्त्यावर अंबरनाथ शहराच्या पूर्वेतून प्रवास करण्यासाठी आनंदनगर औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ खड्डे लागतात. पुढे याच मार्गावर नेवाळी चौकात मलंगगडाकडून येणाऱ्या रस्त्यावर सखल भाग असल्याने पाणी साचते.
नेवाळी चौकातील मुख्य रस्त्यावर येण्याआधी या पाण्यात थांबावे लागते. अनेकदा नेवाळी चौकात कोंडी होते. त्यावेळी अनेक दुचाकीस्वार या पाण्यात अडकून पडतात. पुढे खोणी – तळोजा रस्त्यावरही वेगळी स्थिती नाही. या भागात उसाटणे आणि आसपासच्या गावांमध्ये कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र ते रस्ते मुख्य मार्गाला जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे अंतर्गत कॉंक्रिट रस्त्यावरून खड्ड्यात आणि मग मुख्य रस्त्यावर यावे लागते. मुसळधार पावसात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहन आदळत असल्याने चालक हैराण झाले आहेत.
वाहतुकीचा प्रचंड ताण
कल्याण पूर्वेतील मलंगगड भागाला थेट जोडणारा खोणी तळोजा महामार्ग महत्वाचा आहे. या रस्त्यावरून ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची, कामगारवर्गाची मोठी वाहतूक होत असते. तर कल्याण काटई राज्यमार्ग मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत जाण्यासाठी महत्वाचा आहे. अंबरनाथ, बदलापुरपासून विविध शहरातले वाहनचालक या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो.
खोणी चौकातली कोंडी फोडा
खोणी चौक हा काटई अंबरनाथ रस्ता आणि खोणी तळोजा रस्त्यासाठीचा महत्वाचा चौक आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतून येणारे अवजड वाहने, टँकर या चौकात वळण घेताना अडकतात. तर मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने येणारी प्रवासी वाहतुकही याच चौकात येते. त्यामुळे येथे सातत्याने कोंडी होते आहे. या कोंडीमुळे अनेकदा दोन्ही महत्वाचे मार्ग पूर्णपणे बंद होतात. त्यामुळे येथे ठोस उपाययोजना करण्याची मागणी होते आहे.