कल्याण – मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील रेतीबंदर खाडी वळणावर लोकलमधून पडून एका २१ वर्षाच्या तरुणाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मुंब्रा कौसा भागात राहणारा हा तरुण मुंबईत एका कंपनीत आंतरवासिता ( इंटर्नशिप) करत होता. नोकरीची सुरुवात करत असतानाच या तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आयान शेख (२१) असे या तरुणाचे नाव आहे. तो कौसा भागातील शिमला पार्क भागात राहत होता. तो शुक्रवारी सकाळी आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यास निघाला होता. मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकल पकडून तो मुंबई दिशेने जात होता. गर्दीमुळे त्याला डब्यात जाता आले नाही. ठाणे रेल्वे स्थानकात गर्दी कमी होईल असे वाटल्याने तो दरवाजात उभा राहून प्रवास करत होता. रेतीबंदर भागातील तीव्र वळणावर लोकल वेगात असल्याने दरवाजात उभ्या असलेल्या आयान शेख याचा तोल गेला आणि तो लोकलमधून थेट वळणावरील रेल्वे पुलावरून जमिनीवर पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मरण पावला, अशी माहिती मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रफिक शेख यांनी दिली.

अशाच प्रकारे इतर तीन प्रवाशांचा या भागात पडून मृत्यू झाला आहे. हे अपघात नसून व्यवस्थेची असंवेदनशीलता आहे. मुंब्रा रेल्वे स्थानक भागातील तीव्र वळणांचा रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. त्याशिवाय हे मृत्यू थांबणार नाहीत, असे शेख यांनी सांगितले. गेल्याच महिन्यात मुंब्रा येथ तीव्र वळणावर लोकलमधून पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची रेल्वेकडून चौकशी सुरू आहे. तीव्र वळणच या अपघाताला जबाबदार असल्याचा प्राथमिक निष्कर्ष रेल्वे तपास अधिकाऱ्यांनी काढला आहे.

हे मृत्यू रोखण्यासाठी दिवा-सीएसएमटी, ठाणे ते कसारा, कर्जत, आसनगाव, टिटवाळा शटल सेवा सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रफिक शेख यांनी केली आहे. मुंब्रा येथील तीव्र वळणावर लोकलचा वेग प्रमाणात ठेवण्याच्या सूचना रेल्वेच्या वरिष्ठांनी मोटारमन विभागाला केल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपर येथे दोन दिवसापूर्वी एक प्रवासी लोकलमधून पडून मरण पावला. अनेक प्रवासी गार वाऱ्यासाठी लोकल दरवाजात उभे असतात. काही जण दरवाजात उभे राहून मोबाईलमध्ये दंग असतात त्यामुळेही हे अपघात होतात, असे प्रवाशांनी सांगितले.