पोलिसांनी रात्री उशीरा घरी निघालेल्या पती-पत्नीकडून विनाकारण लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी क्युआर कोडद्वारे लाच घेतल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील आहे. एका पोलिसाने विनाकारण त्रास दिल्यानंतर पीडित व्यक्तीने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होताच पोलिसांनी घाईघाईत आरोपींवर कारवाई करत त्यांना निलंबित केलं आहे.
हेही पाहा- प्रेयसीचं लग्न ठरलं म्हणून प्रियकराचा नवरदेवाच्या घरासमोर राडा; दरवाचा बंद केला अन्…
या घटनेतील पीडित व्यक्तीचं नाव कार्तिक पत्री असं आहे. कार्तिकने त्याच्यासोबत घडलेली घटना ट्विटरवर शेअर केली, यासाठी त्याने जवळपास १५ ट्विट आहेत. ट्विटद्वारे त्याने माहिकी दिली की, तो बंगळुरूमध्ये राहतो, रात्री साडेबाराच्या सुमारास एका मित्राच्या घरात केक कापून तो पत्नीसह घरी पायी निघाला असताना एक पोलिस गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. गाडीतून दोन पोलिस खाली उतरले आणि या पती-पत्नीची चौकशी करू लागले.
या चौकशीदरम्यान पोलिसांनी दोघांना ओळखपत्र दाखवायला सांगितल्यानंतर दोघांनी मोबाईलवर आधार कार्डचा फोटो दाखवला. ओळखपत्र दाखवल्यानंतर पोलिसांनी दोघांचे फोन जप्त केले आणि पुन्हा चौकशी सुरू केली. या दोघांना अकेक प्रश्न प्रश्न विचारल्यानंतर दोघांना दंड भरायला सांगितला. मात्र, आमच्याकडून दंड घेण्याचं कारण विचारलं असता, रात्री ११ नंतर रस्त्यावर फिरू दिले जात नसल्याचं विचित्र कारण या पोलिसांनी दिलं. शिवाय यासाठी तब्बल ३ हजार रुपयांचा दंड भरायला सांगितला. अखेर हे प्रकरण १००० रुपयांवर मिटले आणि पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या QR कोडवर १००० रुपये पाठवायला सांगितले.
क्युआर कोडद्वारे पैसे दिल्यामुळे या व्यक्तीकडे पैसे दिल्याचा पुरावा होता. त्यामुळे त्याने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डीसीपी अनुप ए शेट्टी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देली असून आरोपी पोलिसांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं.