आपण पिढय़ान् पिढय़ा ही गोष्ट ऐकत आलो. तसेच ससा कासव या दोघांच्या पुढील पिढय़ांतपण ही गोष्ट सांगितली गेली. पुन्हा अशीच शर्यत एका बढाईखोर तरुण सशाने कासवाशी लावली. मनाशी एक गोष्ट लक्षात ठेवून की वाटेत धावताना कोठेही खायचे नाही व झोपायचे नाही. हा सशाचा गुप्त बेत कासव (प्रतिस्पर्धक) याच्या कानावर आला. त्यानेही ठरविले मीच ही शर्यत जिंकणार. दिवस उजाडला स्पर्धेचा. ससे आणि कासव सहकुटुंब माळावर जमा झाले. एका बाजूला (रेषेच्या) ससा समुदाय व दुसऱ्या बाजूला कासवजन. पाच कि.मीटर धावत जाऊन टेकडीच्या पायथ्याशी पोहोचणे ही अट. घारीने आकाशातून कर्कश्श शिटी मारली व सुरुवात झाली. ससे कंपनी, शर्यत जिंकणार आपला पठ्ठा, म्हणून खूश होती. कासव तुरुतुरु चालत (धावत) सुटले. ससा बाणाप्रमाणे पळत सुटला. १ कि.मीटर (खूण) पार होताच सशाने मागे वळून बघितले तेव्हा कासव १५ मीटरपण धावले नव्हते. सशाने वेग वाढविला. ३ कि.मीटर वर पोहोचतो तर त्याला कासव हळूहळू पुढे जाताना दिसले. त्याने ताजी हवा छातीत भरून घेतली व पळायला लागला. कासव केव्हाच मागे पडले. अंतिम टप्प्याजवळ आला. ससा मनातून खूश झाला. आपल्या मागची (मागील वेळेची चूक) चूक महाग पडली होती. म्हणून तो कोठेही न थांबता जीव तोडून पळत होता. फक्त पाच फूट म्हणजे दोन उडय़ा. सशाने उडी मारली. तोच महद्आश्चर्य.. कासव दोरी तोंडात धरून सीमा रेषा पार गेले होते. ससा पुन्हा हरला होता. कारण? कासव बुद्धिमान होते. त्याने टप्प्या टप्प्यावर आपल्या भावंडांना उभे राहायला सांगितले होते. आणि अंतिम रेषेच्या सहा फूट आधी कासवाचा मोठा भाऊ गवतात लपून बसला होता. ससा दिसताक्षणीच त्याने सीमा रेषा पार केली. तात्पर्य : बुद्धिचातुर्य कामी आले आणि ससा पुन्हा शर्यत हरला. निश्चय केला की कधीही कासवाबरोबर शर्यत लावायची नाही. भालचंद्र जोशी - response.lokprabha@expressindia.com