भाईंदर : ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देऊन देशभर खळबळ उडवून देणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मीरा रोड येथे पुन्हा या घोषणेचा पुनरुच्चार केला. यावेळी सभेतील उपस्थितांनी जय श्रीरामच्या घोषणां देत परिसर दणाणून सोडला. मिरा भाईंदर आणि ओवळा माजीवडे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा बुधवारी मिरा रोडच्या सेंट्रल पार्क मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी ‘बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं’ या प्रसिद्ध झालेल्या वाक्याचा पुनरुच्चार करीत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. योगी यांनी घोषणा देताच उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला. जय श्रीरामच्या घोषणा देत नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. देशात सर्वाधिक काळासाठी काँग्रेसने शासन केले आहे. मात्र विकास कामे करण्याऐवजी त्यांनी देशाला लुटले आहे. २०१४ पूर्वी भारत हा दुर्बल अवस्थेत होता.मात्र नरेंद्र मोदीचे नेतृत्वामध्ये देशात सुरक्षिता आणि विकासाचे वातावरण पसरले असल्याचे योगी म्हणाले. आगामी निवडणूक ही अस्मिता व अस्तित्व टिकवण्याची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे समर्थपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसने विकास कामे तर सोडा किमान राम मंदिर तरी उभारायला पाहिजे होते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : “वसईच्या सनसिटी येथे धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न”, आमदार क्षितीज ठाकूर यांचा आरोप

‘बटेंगे तो कंटेंगे’ घोषणेचे टी शर्ट

योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच मिरा भाईंदर शहरात आल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तसेच सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी ‘ बटेंगे तो कंटेंगे ‘ असे वाक्य लावलेले टीशर्ट घातले होते आणि फलक हातात घेतले होते. योगींची व्यासपीठावर येताच सर्वांकडून जय श्री रामची घोषणाबाजी करण्यात आली. सभेसाठी उत्तर भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. यावेळी माजी मंत्री कृपाशंकर सिंग,शिवसेना भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष राजू भोईर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : लांब पल्ल्याच्या गाड्यांना भाईंदरमध्ये थांबा मिळणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिपू सुलतान चौकाचे नाम बदलण्याचे आश्वासन

मिरा रोड येथील नया नगर मध्ये एका चौकाचे ‘हजरत टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. या बाबतचे नामफलक स्थानिक नगर सेवक नरेश पाटील यांच्या निधीतून लावण्यात आले होते. जिंकून येताच या चौकाचे नाव बदलणार असल्याचे आश्वासन भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांनी दिले आहे.