भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून, वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मिरा-भाईंदर शहरात महापालिकेची स्वतंत्र परिवहन बससेवा कार्यरत आहे. सध्या महापालिकेकडे ९० हून अधिक बसगाड्या असून त्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे. प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गांवर या बसगाड्या धावत आहेत.मात्र, यातील अनेक बसगाड्या तांत्रिकदृष्ट्या खराब अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावर धूर पसरत असून प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी भाईंदर (पूर्व) रेल्वे स्थानकाहून एल.आर. तिवारी कॉलेज परिसरात जाणारी क्रमांक १२ ची परिवहन बस मोठ्या प्रमाणात धूर सोडत असल्याचे दिसून आले. ही बस दाट रहदारीच्या मार्गांवरून जात असल्यामुळे तिच्या मागून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असल्याचे प्रवाशांनी सांगितले. शासकीय बस इतकी नादुरुस्त अवस्थेत असूनही ती सर्रास रस्त्यावर धावत असताना वाहतूक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बसगाड्यांच्या दुरुस्तीकडे कंत्राटदाराची पाठ

मिरा-भाईंदर महापालिकेने परिवहन बसगाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी घोडबंदर येथे एक आधुनिक बस आगार उभारले आहे. येथे बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र गॅरेजची व्यवस्था आहे. तसेच, रस्त्यावर अचानक बंद पडणाऱ्या बसगाड्यांसाठी एक विशेष दुरुस्ती बस खरेदी करून ठेवण्यात आली आहे.

प्रशासनाकडून कंत्राटदाराला प्रवाशांच्या सुरक्षित व प्रदूषणमुक्त प्रवासासाठी बसगाड्यांची नियमित देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत असून नादुरुस्त बसगाड्या सर्रासपणे रस्त्यावर चालवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.कंत्राटदाराने जर अशी नादुरुस्त बसगाडी रस्त्यावर चालवली, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.