भाईंदर : खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी भाईंदरच्या घोडबंदर येथे ही दुर्घटना घडली. खड्ड्यात पडलेला दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या एसटी बसने धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसाने महामार्गवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घोडबंदर येथून दुचाकीने प्रवास करत असताना मोहनिश अहमद इरफान खान (३७) या दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो खड्ड्यात पडला. त्याच वेळी त्याला मागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसने (एमएच बीटी २६७३) धडक दिली. या अपघातात खान यांचा जागीच मृत्यू झाला.या संदर्भात कशिमीरा पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात कलम ३०४(अ),२८९ आणि १८४ अंतर्गत गुन्हाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.