पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणा कामाला लावली असून गुजरातचे पोलीसही महाराष्ट्रात आणले आहेत, असा आरोप करत राज्यातील निवडणूक आयोग आमच्या पक्षाला खर्च विचारतो आणि आमच्या बाथरूमपर्यंत कॅमेरे घेऊन घुसतो. पण, त्यांना हे दिसत नाही का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी ठाणे येथील प्रचार सभेत बोलताना उपस्थित केला. तसेच शिवजयंती साजरी करत नाही आणि शिवाजी महाराजांचा आर्शिवाद मागतात, अशी टिका त्यांनी यावेळी भाजपवर केली.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आता देशात बदल घडेल असे वाटले. पण, ते गुजरातच्या पुढे जातच नाहीत. गुजरातपेक्षा महाराष्ट्र मोठा करेन, असे मोदी सांगतात. पण, ही पंतप्रधानांची भाषा नाही. पंतप्रधानांसाठी सर्व राज्य समान असतात, ते कुणा एका राज्याचे नसतात. ते संपुर्ण देशाचे असतात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदींवर टिका केली. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई मुंबईतील कार्यक्रमात जे काही बोलल्या, त्यावर मोदींनी त्यांना का नाही खडसावले. देशाचे सैनिक आजही शहीद होतात, हेच का ते ‘अच्छे दिन’ आहेत, अशी टिकाही त्यांनी केली. एनडीएमध्ये शरद पवार येणार होते. पण, संघातील एका नेत्याने विरोध केल्याने त्यांना घेतले नाही असा दावा केला.