|| शरदमणी मराठे

विश्वातील कृष्णविवराची पहिली प्रतिमा मिळवण्यात वैज्ञानिकांना यश आले असून गुरुत्वीय लहरींच्या शोधानंतर जागतिक पातळीवरील वैज्ञानिकांच्या सहकार्यातून साकार झालेली ही अजोड कामगिरी आहे. त्या निमित्ताने..

पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी कृष्णविवराचे पहिले छायाचित्र नुकतेच प्रसिद्ध केले. आपल्यापासून साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या त्या अद्भुताचे चित्र बघताना अंगावर काटा आला. १९६० च्या दशकाच्या शेवटी चंद्रावर माणसाने ठेवलेले पाऊल असेल, १९७० च्या दशकात भारताने अंतराळात सोडलेला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह असेल, पोखरण येथे केलेली पहिली अणुचाचणी असेल, १९८० च्या दशकात भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्माने, रशियाच्या सोयुझ अवकाशयानातून केलेले पहिले उड्डाण असेल.. माझ्या वयाच्या पंचविशीच्या आत घडलेल्या या घटना होत्या. त्या प्रत्येक वेळी असाच अनुभव आला होता. विशाल अंतराळाचा, सृष्टीच्या उगमाशी जोडलेल्या शाश्वत सत्याचा किंवा अणूतील सूक्ष्म कणांपासून ते अनेक आकाशगंगांना सामावत सतत वृद्धिंगत होणाऱ्या विशाल ब्रह्मांडाचा कोणी वेध घेण्याचा कुठलाही लहानमोठा प्रयत्न मनात अशाच सुखद लहरी निर्माण करतो.

स्वत: शास्त्रज्ञ वगैरे नसलेल्या मला अशा प्रसंगी पुन:पुन्हा कविवर्य वसंत बापट यांची ‘अकरावी दिशा’ ही कविता आठवते. गंमत म्हणजे वर उल्लेखलेली शास्त्रीय घटना घडण्याच्या किती तरी आधी ही कविता लिहिली गेली आहे. बहुधा १९६०-६१ च्या सुमारास वा अजूनही आधी! विविध दिशांनी येणाऱ्या नवनवीन अनुभवांचे स्वागत करण्यासाठी बापट एकेका दिशेला असणाऱ्या भिंती हलवण्याचा आग्रह धरतात. जणू अज्ञानाच्या, अल्पसंतुष्टतेच्या, स्थितिप्रिय असण्याच्या बेडय़ा तोडायला सांगतात आणि क्षितिजावर अवतरणाऱ्या नव्या आविष्कारांना सामोरे जाण्याचे आवाहन करतात. बापट लिहितात.. एकेका दिशेचा नामोल्लेख करत लिहितात..

एक भिंत हलवा किमान, ही इथली उत्तरेची

ध्रुवाच्या स्निग्ध प्रकाशाने उजळलेला वारा

येऊ  दे केशरफुलांच्या पायघडय़ावरून

मग उरलेल्या कडव्यात बापट उत्तर दिशेच्या संदर्भात ऐतिहासिक घटनांचा, वस्तूंचा, भूवैशिष्टय़ांचा, पशुपक्ष्यांचा संदर्भ देत त्या वाऱ्याविषयी, ‘त्याला वाट द्या’ असे आवाहन करतात.

मग पाळी येते पूर्व दिशेच्या भिंतीची.. बापट म्हणतात..

‘अंदमानच्या अंधारातून उगवणाऱ्या आरक्त सूर्याला अडवू नका.’ मग त्या कडव्यात भारताच्या पूर्व प्रदेशातील कोणार्कचे, पूर्वेकडील कवींच्या रचनात असणाऱ्या अष्टपदीचे, पूर्वाचलाच्या बैठय़ा देवालयांवरील पताकांचे, गड-किल्ल्यांचे, गोदावरीच्या मुखापासून पसरलेल्या बंगालच्या उपसागराचे अशी अनेक लोभस वर्णने येतात. पूर्व दिशेने येणाऱ्या नव्या अनुभवांचे स्वागत करण्याचे आवाहन करत ते कडवे संपते.

एकेक कडवे संपले तरी बापट काही तरी अजून सांगायचा प्रयत्न करत आहेत. ते कधी उलगडणार आपल्यासमोर, अशी चुटपुट प्रत्येक कडवे लावतच जाते. पुढे बापट पश्चिमेची आणि दक्षिणेची भिंत हलवण्याचेदेखील क्रमाने आवाहन करतात. पश्चिमेकडील विशाल सागरांचे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून ते स्पेनमधल्या माद्रिदमधील बैलांच्या झुंजीपर्यंतच्या विविध प्रतिमांचा गोफ बापट लीलया गुंफतात. दक्षिण भारतातील मराठेशाहीच्या दक्षिण दिग्विजयाचे संदर्भ या मराठी कवीच्या लिहिण्यात न आले तरच नवल; पण हे सारे ‘आपले’ वाटणारे, ‘आपले’ असलेले अनुभव भोगून, अनुभवूनही शेवटी ते त्या त्या दिशेच्या भिंती दूर करण्याचे व नव्या क्षितिजावर येणाऱ्या नव्या अनुभवांचे स्वागत करण्याचे आवाहनही सातत्याने करतच असतात आणि ‘.. आता पुढे काय’ या हुरहुरीच्या आवर्तात रसिक वाचकाला ओढून नेतात.

माणूस अज्ञाताचा ध्यास घेतो, विश्वाच्या उगमाच्या प्रक्रियांचा शोध घेतो, नेहमी किरणांसारखा वाटणारा प्रकाश, कणांसारखा का वागतो याच्या मुळाशी जातो, जिथून येणारा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी कोटय़वधी वर्षे लागतात त्या दूरस्थ अद्भुताची समीकरणे मांडतो. ज्ञात असलेल्या दहा दिशांच्या पलीकडला तो प्रांत असतो. आपल्या अनुभवपटलासमोर ‘आता संपले’ असे वाटणारी भिंत एकेका शास्त्रज्ञाने हलवली तेव्हा कुठे या अज्ञाताच्या दिशेचा वेध त्यांना घेता आला. जणू त्यानंतर फुटणाऱ्या वाटांबद्दलच बापट पुढे लिहितात..

‘ठेवणारच असाल सगळ्या भिंती तर ठेवा मग!

निदान हे छप्पर ठेवू नका, ओझ्याच्या वजनाचे..

इथूनच फुटते वाट विश्वामित्र सृष्टीची..

ब्रह्महृदयाची ती अधीर खूण तुम्हाला दिसत नाही का?

दोन मार्ग निघतात हे.. वेदांची शपथ

सूर्याच्या किरणांच्या पोलादी तारांवर

तर्काच्या परशूने ताऱ्यांचे छेद करीत

सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गावर मला जाता येणार नाही..’

तसा मी बापटांचा फॅन आहे. बापटांच्या कवितेच्या शेवटच्या कडव्याचा हा भाग वाचताच मी अनेकदा थांबलो आहे आणि पुन:पुन्हा हा भाग वाचला आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी स्वत:च्या डेस्कवर इंटरनेटची जोडणी आली तेव्हा, घरातील पुढल्या पिढीच्या तोंडी  अक, कडळ वगैरे शब्द आले तेव्हा मला नेहमीच ‘अकरावी दिशा’ आठवली आहे. बर्न शहरात आइन्स्टाइन यांच्या राहत्या घराचे केलेले म्युझियम बघताना, त्यांना मिळालेले नोबेल पदक बघताना, स्वित्झर्लण्ड-फ्रान्स सीमेवर असलेला ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’चा विशाल आणि अद्भुत प्रयोग बघताना, तिथे विश्वनिर्मितीच्या रहस्याचा वेध घेण्याच्या प्रयोगात रममाण झालेल्या शास्त्रज्ञांना बघताना, ‘हिग्स-बोसॉन’ कण मिळाल्याचे जाहीर करतानाची दृश्ये बघताना, मला नेहमीच या ओळी आठवल्या आहेत, पुन्हा वाचाव्याशा वाटल्या आहेत. ‘सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गावर मला जाता येणार नाही..’ यापेक्षा काय ठरवले असेल त्या त्या काळातल्या वैज्ञानिकांनी? ‘इथूनच फुटते वाट विश्वामित्र सृष्टीची..’ असा नव्या ज्ञानमार्गाचा साक्षात्कार कसा झाला असेल शास्त्रज्ञांना?

सर्नमध्ये (उएफठ) म्हणजे युरोपीय अणुसंशोधन संस्थेच्या आवारात, भारताच्या सर्नमधल्या सहभागाचे प्रतीक म्हणून नृत्य करणाऱ्या शिवाची, नटराजाची मोठी मूर्ती आहे. भारताच्या ज्ञानसंपदेला नव्या संशोधन प्रक्रियेशी जोडणारे ते प्रतीक आहे. ते बघताना एक भारतीय म्हणून आनंद होतोच; शिवाय अशा अज्ञाताचा वेध घेणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि प्रक्रिया यांच्याबद्दल आपण नतमस्तक होतो. तिथे मला बापटांच्या कवितेच्या शेवटच्या ओळी आठवल्या..

‘सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गावर मला जाता येणार नाही

माझा मार्ग दुसरा आहे

चंद्रकिरणांच्या लक्ष्मणझुल्यावर भोवळ आल्याशिवाय

कशी सापडणार आकाशगंगा?

तुम्हाला माहीत आहे ना?

कोऽहंच्या हाकेला सोऽहंचा प्रतिसाद मिळतो

ते अनादी देठाचे ओंकार-कमळ मी शोधत आहे

किरणातून येणाऱ्या त्याच्या परागांना वाट द्या,

अरे त्यांना वाट द्या,

तीच अकराव्या दिशेची धूळ आहे.

 

sharadmani@gmail.com