आगामी २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि रिपाइंतही शहर अध्यक्षांसह कार्यकारिणीमध्ये फेरबदलाची चर्चा होऊ लागली असून काही कार्यकर्ते अचानक सक्रिय झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या महानगराची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया आटोपली असून शहरातील ७२ प्रभागांच्या अध्यक्षासह विधानसभानिहाय सहा मंडळाचे अध्यक्ष घोषित करण्यात आल्यानंतर शहर अध्यक्षपदी आमदार कृष्णा खोपडे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलांचे संकेत मिळाले असून त्या दृष्टीने काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे मागणी केल्याची चर्चा आहे. शिवाय आगामी लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेतही पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिले आहे त्यामुळे स्थानिक नेतृत्व सगळ्यांना घेऊन चालणारे असावे, अशी मागणी केली जात असल्यामुळे नेतृत्व बदलाची चर्चा होऊ लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांना पक्षाच्या एका गटाकडून विरोध असल्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. माजी अध्यक्ष  दिलीप पनकुले यांनी मधल्या काळात अजय पाटील यांच्यावर आरोप करून त्यांना शहर अध्यक्षपदी विरोध करण्यात आला होता मात्र पाटील यांचे वरिष्ठांकडे  असलेले राजकीय वजन लक्षात घेता त्यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मधल्या काळात पाटील यांच्या कार्यशैलीमुळे अनेक कार्यकर्ते दुखावल्यामुळे त्यातील काहींनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्यासमोर पाटील यांचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली. मात्र त्या संदर्भात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीला फारसा प्रतिसाद दिला नसल्याची चर्चा आहे. मात्र गेल्या आठ-दहा दिवसापासून पुन्हा कार्यकर्त्यांनी शहरात नेतृत्वबदलाची मागणी केली आहे. अनिल अहिरकर यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.
काँग्रेसमधील वेगवेगळ्या गटातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची काँग्रेसचे शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांची ख्याती असली तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नेतृत्वावर काँग्रेसमधील एक गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. देवडिया भवनमध्ये शहर कार्यकारिणीच्या बैठकीच्यावेळी गुप्ता यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. खासदार विलास मुत्तेमवार, खासदार मुकूल वासनिक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिल अहमद ही पक्षातील ज्येष्ठ मंडळी जाहीरपणे बोलत नसतील तरी खाजगीमध्ये शहराच्या कार्यकारिणीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे बोलत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होण्याची चिन्हे असल्यामुळे गुप्ता यांना पर्याय शोधण्याचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे.  
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभूर्णे यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या जागेवर विभागीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. त्यातील काही कार्यकर्ते पक्षाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांच्या संपर्कात आहेत. रिपब्लिकन पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी वेगवेगळे गट स्थापन केले असले तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हाच रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचा दावा चळवळीतील कार्यकर्ते करीत आहे.
पक्षाला तरुण नेतृत्व हवे असल्याने त्यामुळे शहर अध्यक्ष प्रकाश कुंभे, प्रा. बुद्धराज मून, वसंत हुमणे आणि विलास गजघाटे या चार प्रमुख नावांची चर्चा आहे. सध्या कर्नाटकमधील एन. राजेंद्रन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनडॉ. राजेंद्र गवई यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. या चारपैकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.