मॅजेस्टिक बुक डेपो आणि लोकमान्य सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या ‘मॅजेस्टिक गप्पां’ची सुरुवात लेखक किरण नगरकर यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. पत्रकार राम जगताप व प्रा. नितीन रिंढे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
जागतिक स्तरावर घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांना आपण जबाबदार असतो. एखाद्या चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज न उठविल्यामुळे अथवा आपले मत न मांडल्यामुळे आपण त्या गोष्टीला पाठिंबा दर्शवितो, असा समज होतो आणि त्यामुळे समाजातील वाईट प्रवृत्ती जोमाने वाढतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतून लोप पावत चाललेली चाळ संस्कृती. अमेरिकेचे अनुकरण करत असलेल्या स्पर्धेच्या जगात आजचा समाज इतका संवेदनशील झाला आहे की, प्रशंसेशिवाय आपण काहीच सहन करू शकणार नाही, अशी मांडणी नगरकर यांनी चर्चेच्या ओघात केली.
सामाजिक आणि राजकीय भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक असून त्याचबरोबर आपले स्वतंत्र विचार समाजासमोर मांडले पाहिजेत, तरच आपली प्रगती होऊ शकते, असेही नगरकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. रेखा सबनीस यांनी या वेळी नगरकर यांच्या ‘सात सकं त्रेचाळीस’ या पुस्तकातील काही भागाचे वाचन केले.
कला दिग्दर्शकाचे काम व्यापक -शशांक तेरे
कला दिग्दर्शकाचे काम हे आता नुसते चित्रपटातील वास्तूरचना उभारण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. ते आता कथा वाचून त्या कथेसाठी आवश्यक असलेल्या चित्रिकरणाच्या जागेपासून ते तिथे उभारण्यात येणाऱ्या घरांच्या भिंतीपर्यंत तसेच पडद्यावर दाखविता न येणाऱ्या गोष्टींचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थान निर्माण करणे येथपर्यंत व्यापक झाले आहे, असे कलादिग्दर्शक शशांक तेरे यांनी सांगितले. मॅजेस्टिक बुक डेपो आणि लोकमान्य सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये निनाद सिद्धये यांनी तेरे यांची प्रकट मुलाखत घेतली. भविष्यात एखाद्या मराठी चित्रपटाची कथा आपल्याला भावली तर कला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची इच्छाही तेरे यांनी व्यक्त केली.
‘अंतरिक्षातील ओढ’
या कार्यक्रमात नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे, पत्रकार श्रीराम शिधये, प्रा. मोहन आपटे सहभागी झाले होते. डॉ. बाळ फोंडके यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मानवामध्ये असलेल्या जिज्ञासू वृत्तीमुळे त्याने आपले ज्ञान अवकाशापुरते मर्यादित न ठेवता निरनिराळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून इतर सजीवांपेक्षा आपले वेगळपण सिद्ध केले आहे.
 अवकाश संशोधनाकडे आता व्यवसाय म्हणून तरुण पिढी वळू लागली आहे. त्यामुळे रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे, असे मत परांजपे यांनी मांडले. तर शिधये यांनी सांगितले की, अनेक देश मंगळाबाबत वेगवेगळे शोध लावत आहेत. जर मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी होती, असे मानले तर भविष्याच्या दृष्टीने ती जीवसृष्टी अस्तंगत होण्याची कारणे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. तर प्रा. आपटे यांनी अमेरिकेपेक्षा भारताची विचार करण्याची पद्धत वेगळी असून भारताचे तंत्रज्ञान देखील अधिक प्रगत असल्याचे काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
मराठी चित्रपटांचे नवनवीन
विक्रम व्हावेत -स्वप्नील जोशी
मराठी चित्रपटांचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होणे आवश्यक असून त्यासाठी जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहायला पाहिजेत, असे प्रतिपादन अभिनेते स्वप्नील जोशी यांनी केले. मॅजेस्टिक गप्पांमध्ये अमेल परचुरे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.