प्रतापगड सहकारी साखर कारखाना १६ वर्षांंसाठी भागीदारी तत्त्वावर चालविण्यासाठी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने घेतला आहे. दोन्ही कारखान्यांच्या वतीने किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी ही माहिती सांगितली. या वेळी प्रतापगडच्या अध्यक्षा सुमित्रा शिंदे उपस्थित होत्या.
१६ वर्ष प्रतापगड साखर कारखाना भागीदारीत चालवताना किसन वीर कारखान्याने प्रतपगडची सरकारी व इतर कर्जाची ५१ ते ५५ कोटी रुपयांची देणी द्यायची आहेत. किसन वीर व प्रतापगडच्या ऊस दरात कोणतीही तफावत राहणार नाही. प्रतापगडच्या कार्यक्षेत्रात चाळीस ते पन्नास मेट्रिक टन ऊस आहे. प्रतापगड चालविण्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडीच तीन लाख मेट्रीक टन ऊस अपेक्षित आहे. ऊस मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध नसल्याने कारखान्यास गेटकेन करावे लागत होते. कारखान्याची आर्थिक स्थिती व सभासद कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून मी सर्व संचालक भागीदारी तत्त्वावर किसन वीर कारखान्यास चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुमित्रा शिंदे यांनी सांगितले.