घरगुती आणि रासायनिक सांडपाणी तसेच बेकायदा बांधकामांच्या अतिक्रमणांमुळे एका मोठय़ा गटाराची अवकळा प्राप्त झालेल्या वालधुनी नदीचे नष्टचर्य अजूनही कायम आहे. मुंबईतील मिठीप्रमाणेच शहरीकरणाची बळी ठरलेल्या या नदीच्या शुद्धीकरणासाठी नेमण्यात आलेले प्राधिकरण केवळ कागदावरच राहिले असून नदीचे पात्र मात्र अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस आकुंचन पावत आहे. गेल्या महिन्यात नदीत सोडण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्यांमुळे परिसरातील शेकडो नागरिकांना विषारी वायूची बाधा झाली होती. त्यानंतर शासनाच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने वालधुनीच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याचा मनोदय व्यक्त केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही वालधुनी नदीच्या पात्रात भराव टाकून त्यावर अनधिकृत बांधकामे करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येते.
श्रीमलंग डोंगररागांमधून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराजवळून वाहत येणारा वालधुनी नदीचा प्रवाह पुढे उल्हासनगर मार्गे कल्याण खाडीला मिळतो. अनधिकृत बांधकामांचे आगर अशी ख्याती असलेल्या उल्हासनगरमधून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे आहेत. नदीच्या दोन्ही तीरांवरील झोपडपट्टय़ांमधील सर्व सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते. गेल्या महिन्यात घडलेल्या विषारी वायू दुर्घटनेनंतर किमान अतिक्रमणांचे हे सत्र थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती सपशेल फोल ठरली आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांच्या सीमारेषेवर उल्हासनगरच्या हद्दीत भिडेवाडीजवळ मोठय़ा प्रमाणात नदीच्या पात्रात भराव टाकून जागा बळकाविण्याचे
भूमाफियांचे उद्योग सुरू आहेत. याच ठिकाणी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना जोडणारा नवा पूल काही महिन्यांपूर्वी कार्यान्वित करण्यात आला आहे. या पुलाच्या आगे-मागेच भूमाफियांची लुडबुड सुरू आहे. त्यासाठी आधी नदीकाठी असणारी झाडे पद्धतशीरपणे तोडून टाकण्यात आली. त्यामुळे येथे पूर्वी येणारे विविध प्रकारचे पक्षी येईनासे झाले आहेत. आता नदीच्या पात्रात भराव टाकून जागा अडवली जात आहे. येथे ऐन नदीच्या पात्रात एक तबेला आहे. झालेली अतिक्रमणे हटविणे प्रशासनाच्या दृष्टीने अडचणीचा आणि डोकेदुखीचा विषय आहे. त्यामुळेच वालधुनी शुद्धीकरणाचे बेत सपशेल फसले आहेत. किमान नवी अतिक्रमणे रोखून नदीचे मरण रोखावे, असे कळकळीचे आवाहन स्थानिक नागरिक करीत आहेत.
नदीच्या पात्रात गटारांचे चेंबर
आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्या महापालिकांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे. वालधुनी नदीच्या सध्याच्या अवस्थेत अंबरनाथ पालिका तसेच उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका जबाबदार आहेत. जागेच्या अडचणीमुळे भुयारी गटार योजनेचे चेंबरच थेट वालधुनीच्या पात्रात उभारण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नदीचे शुद्धीकरण होणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
म्हाडाच्या जागेतही आक्रमण
याच ठिकाणी नदीकाठी अंबरनाथ शहराच्या हद्दीत म्हाडाची जागा असून एक इमारतही बेवारसपणे गेली कित्येक वर्षे उभी आहे. या इमारतीचे दरवाजे-खिडक्याही काढून नेण्यात आल्या आहेत.