नवी दिल्ली : रेल्वेला भविष्याच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाचे अग्रणी बनविण्यासाठी आर्थिक पाहणी अहवालाने रेल्वेवरील भांडवली खर्चात वेगवान वाढीची शिफारस केली असून, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी जादा तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. केवळ प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठीच नाही, तर राष्ट्रीय रेल्वे आराखडय़ात निश्चित केल्यानुसार मालवाहतुकीतील रेल्वेचा वाटा सध्याच्या २६-२७ टक्क्यांवरून ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी रेल्वेला जादा निधी देण्याची आवश्यकता असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. राष्ट्रीय रेल्वे आराखडय़ात, रेल्वेची २०५० सालापर्यंतची वाढ पूर्ण करण्यासाठी रेल्वेचे जाळे २०३० सालापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने त्याचा क्षमता विस्तार करण्याचा आराखडा आखून देण्यात आला आहे. या आराखडय़ानुसार, रेल्वे मालवाहतुकीच्या रचनेतून सध्याच्या ४७०० मेट्रिक टन या स्तरावरून २०३० सालापर्यंत ८२०० मेट्रिक टनावर मालवाहतूक जाण्याची अपेक्षा आहे.