पीटीआय, नवी दिल्ली – रिलायन्स जिओच्या माध्यमातून २०१६ मध्ये दूरसंचार उद्योगात पुन्हा परतणे, ही आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम आणि धाडस होते, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत बुधवारी व्यक्त केले.

रिलायन्स इंडस्ट्रीजने ४जी मोबाइल नेटवर्क स्थापण्यासाठी स्वतःचे अब्जावधी डॉलर गुंतविले. मात्र हे पाऊल आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणार नाही, कारण भारत सध्या डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही, असे त्यावेळी काही विश्लेषकांना वाटत होते. बाजारपेठ तयार नसताना त्यावेळी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानातील केलेली ही गुंतवणूक फळली नाही, तरी रिलायन्सने परोपकार भावनेने केलेले ते दानकर्म होते असे मानूया.

भारताच्या डिजिटलीकरणाच्या घडणीत आणि या बदलाची पायाभरणी करण्यात आपली भूमिका राहिली हे कायम लक्षात ठेवले जाईल, अशी आपण त्यासमयी संचालक मंडळापुढे भूमिका मांडल्याचे अंबानी यांनी सांगितले.

वर्ष २०१६ मध्ये दूरसंचार सेवा सुरू केल्यापासून, जिओने मोफत व्हॉइस कॉल आणि अत्यंत कमी किमतीत डेटा (इंटरनेट) सेवा प्रस्तुत करून भारतीय दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे, ज्यामुळे स्पर्धकांना किंमती कमी करण्यास भाग पाडले गेले आहे आणि देशभरात डिजिटल वापराचा वेग वाढला. जिओच्या आगमनापूर्वी, भारतात मोबाइल इंटरनेट तुलनेने महाग होते आणि मोठी लोकसंख्या या सेवांपासून वंचित होती, असे अंबानी यांनी अधोरेखित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही नेहमीच मोठे धोके स्वीकारले आहेत. जिओ ही आतापर्यंत घेतलेली सर्वात मोठी जोखीम होती. मी स्वत: बहुसंख्य भागधारक होतो, असे अंबानी म्हणाले. जिओच्या प्रवेशामुळे डेटा सेवांची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली. ज्यामुळे ग्रामीण आणि वंचित भागातील लाखो भारतीयांना इंटरनेटचा वापर परवडणारा झाला. भारतात आता ८० कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत, ज्यामुळे ते जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या ऑनलाइन बाजारपेठांपैकी आपण एक बनलो आहोत, अशी त्यांनी पुस्ती जोडली.