मुंबईः भांडवली बाजारात समभाग खरेदी-विक्रीची व्यवहारपूर्तता एका दिवसांत (सेटलमेंट) पूर्ण करणाऱ्या नव्या ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणालीची सुरूवात गुरुवारपासून (२८ मार्च) होत असून, यासाठी पात्र असलेल्या २५ कंपन्यांची यादी मुंबई शेअर बाजाराकडून बुधवारी जाहीर करण्यात आली.
अम्बुजा सिमेंट, अशोक लेलँड, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा, बीपीसीएल, बिर्लासॉफ्ट, सिप्ला, कोफोर्ज, डिव्हिस लॅबोरेटरीज, हिंदाल्को इंडस्ट्रीज, इंडियन हॉटेल्स, जेएसडब्ल्यू स्टील, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, एलटीआय माइंडट्री, एमआरएफ, नेस्ले इंडिया, एनएमडीसी, ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, पेट्रोनेट एलएनजी, समवर्धना मदरसन इंटरनॅशनल, स्टेट बँक, टाटा कम्युनिकेशन्स, ट्रेन्ट, युनियन बँक ऑफ इंडिया, वेदान्त या कंपन्यांचा निवडक २५ पात्र समभागांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा >>> ‘टीसीएस’च्या समभागातही २ टक्क्यांनी घसरण

सध्या भारतीय भांडवली बाजारात सुरू असलेल्या ‘टी प्लस एक’ प्रणालीनुसार समभाग खरेदी आणि विक्रीची नोंद गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात व्यवहारानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण होते. त्यामुळे विक्री करणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणालीमध्ये सुरूवातीला निवडक २५ कंपन्यांच्या समभागांचा समावेश असून, त्यातील खरेदी-विक्रीची एका दिवसांतच व्यवहारपूर्तता (सेटलमेंट) होईल.
नव्या प्रणालीमुळे समभाग विक्री करणाऱ्या ग्राहकांना त्याच दिवशी पैसे मिळतील. महिन्याच्या सुरूवातीला ‘सेबी’ने ‘टी प्लस शून्य’ प्रणालीच्या प्रयोगरूपातील (बिटा) आवृत्तीला मंजुरी दिली. याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी गुरुवारपासून होणार आहे. सुरुवातीला २५ कंपन्यांचे समभाग आणि मर्यादित दलालांचा (ब्रोकर) यात समावेश असेल. सकाळी ९.१५ ते दुपारी १.३० पर्यंत एका सत्रात हे व्यवहार होतील.

हेही वाचा >>> शेअर बाजारासाठी अग्निपरीक्षेचा काळ ! तीन जागतिक मध्यवर्ती बँकांचे व्याजदर धोरण ठरवणार आगामी कल

बदलत्या काळाशी ताळमेळ राखत, भारताच्या समभाग व्यापारासंबंधी पायाभूत सुविधांना जागतिक मानकांच्या पातळीवर आणणारे हे बाजार नियंत्रक ‘सेबी’ने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यातून भांडवली बाजार आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणाच्या प्रयत्नात, नियामकांनी व्यवहारपूर्ततेच्या कालावधीत उत्तरोत्तर कपात करत आणली आहे. २००२ मध्ये टी प्लस ५ वरून टी प्लस ३ आणि त्यानंतर २००३ मध्ये टी प्लस २ पर्यंत व्यवहारपूर्ततेचा काळ कमी केला गेला. तर जानेवारी २०२३ पासून पूर्णत्त्वाने लागू झालेल्या टी प्लस १ प्रणालीची अंमलबजावणी २०२१ पासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली.

जोखीम कमी होणार !

भारतीय भांडवली बाजारात सध्या सुरू असलेल्या ‘टी प्लस एक’ व्यवहार प्रणालीसोबतच, आता ही ‘टी प्लस शून्य’ ही प्रणाली कार्यान्वित होईल. व्यवहारपूर्ततेचा कालावधी कमी केल्यामुळे खर्च आणि वेळेची कार्यक्षमता अधिक वाढेल. याचबरोबर ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. तसेच, हे व्यवहार त्याच दिवशी झाल्याने त्यातील जोखीमही कमी होईल, अशी ‘सेबी’ची भूमिका आहे.