फारुक नाईकवाडे

मागील लेखामध्ये प्राकृतिक भूगोल व त्याच्याशी संबंधित अभ्यासक्रमातील इतर घटकांची तयारी कशी करावी याबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

मानवी भूगोल

मानवी भूगोलातील विचारधारा अभ्यासताना त्यांमागील ’ॠ्रू – कार्यकरणभाव व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये नमूद निश्चयवाद / निसर्गवाद, संभववाद / शक्यतावाद, थांबा व पुढे जा निश्चयवाद या तीन विचारधारा क्रमाने अभ्यासाव्या लागतील. पहिल्या विचाराची प्रतिक्रिया म्हणून किंवा त्रुटी निवारण्याचा प्रयत्न म्हणून दुसरी आणि दोहोंतील मध्य साधण्याच्या आवश्यकतेतून तिसरी विचारधारा विकसित झालेली आहे हे समजून घेतले तर त्यांचा अभ्यास सोपा होईल. या विचारधारांची मांडणी करणारे समाजशास्त्रज्ञ, त्यांचे इतर कार्य माहीत असायला हवे. प्रत्येक विचारधारेतील महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांची उदाहरणे समजून घ्यायला हवीत. दिलेल्या प्रसंगातील / विधानातील परिस्थितीमध्ये कोणती विचारधारा लागू होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.

विकासासंबंधीची विविध मते हा मुद्दा अभ्यासताना विकासाचे वितरण (Spatial distribution of development) हा विकासात्मक भूगोलातील मुद्दा समजून घ्यावा लागेल. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि मानवी विकासावर भौगोलिक स्थितीचे होणारे परीणाम ढोबळमानाने समजून घ्यावे लागतील. भारतातील विकासाचे हे पैलू थोडे जास्त खोलवर समजून घ्यावे लागतील. विकासाचा असमतोल हा अर्थव्यवस्था घटकातील मुद्दा येथे overelap होतो. हा मुद्दा कोणत्याही एका पेपरमध्ये एकाच वेळी व्यवस्थित अभ्यासणे शक्य आहे.

मानवी वसाहत ग्रामीण व नागरी वसाहत – स्थळ, जागा, प्रकार, अंतरे व त्यांची रचना समजून घेताना अशा वसाहती स्थिरावण्यामागची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक कारणे / पाश्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वसाहतीचे आपले फायदे, तोटे आणि आर्थिक सामाजिक महत्त्व समजून घ्यावे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी वसाहत कोणत्या प्रकारे विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो. असा अंदाज बांधण्याचा सराव तयारीच्या वेळी केल्यास एकूणच या घटकाची तयारी चांगली होईल.

नागरी व ग्रामीण वस्त्यांमधील समस्या समजून घेताना समस्येचे स्वरूप, कारणे, तिच्यामुळे होणारे परिणाम, संभाव्य उपाय असे मुद्दे लक्षात घ्यावेत. यामध्ये ग्रामीण नागरी झालर / किनार क्षेत्राच्या काही वैशिष्टय़पूर्ण समस्या असू शकतात. त्यांचाही अभ्यास या मुद्यांच्या आधारे करायला हवा.

नागरीकरण, नागरीकरणाची प्रक्रिया, नागरी प्रभाव क्षेत्र, प्रादेशिक विकासातील असंतुलन हे परस्परांवर परिणाम करणारे /  प्रभाव टाकणारे मुद्दे आहेत. नागरीकरणाची वैशिष्टय़े, आवश्यकता, स्वरूप, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, त्यांवरील उपाय समजून घ्यावेत. नागरीकरणाची प्रक्रिया अभ्यासताना एखाद्या वसाहतीचे नागरी वसाहतीमध्ये होणारे रूपांतर व त्यासाठी कारक परिस्थिती समजून घ्यावी.

लोकसंख्या भूगोल

लोकसंख्याविषयक सांख्यिकी साधने / माहिती सामग्री कोणती ते माहीत असायला हवे. भारतामध्ये जनगणना अहवाल, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवाल हे अशा माहितीचे अधिकृत स्रोत आहेत. या अहवालांचे स्रोत, त्यांमागील प्रक्रिया, माहिती गोळा करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा हे मुद्दे समजून घेतले पाहिजेत.

महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता व वितरण याबाबतची आकडेवारी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून किंवा जनगणना अहवालातून पाहायला हवी.

महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना व वैशिष्टय़े  अभ्यासताना जनगणना अहवालातील सर्व निर्देशक व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. प्रत्येक निर्देशकाचा अर्थ /  व्याख्या व त्याची सन २००१ व २०११ ची माहिती /  आकडेवारी कोष्टकामध्ये तुलनात्मक  नोंदी करून अभ्यासायला हवी.

लोकसंख्या बदलाचे घटक म्हणून जनन दर, मृत्युदर, लोकस्थलांतर या मुद्यांचा विचार करणे आयोगाला अपेक्षित आहे. या घटकांमुळे राज्याच्या लोकसंख्येची रचना (वय  / लिंग  / साक्षरता /  कार्यकारी लोकसंख्या) कशी बदलते हे समजून घ्यायला हवे. महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्युदर, लोकस्थलांतराचा कल व पातळी याबाबतची आकडेवारी अधिकृत सांख्यिकी स्रोतांतून पाहायला हवी आणि अद्ययावत करत राहायला हवी.

लोकसंख्यावाढ व आर्थिक विकास यांचा एकमेकांवर होणारा परिणाम समजून घ्यायला हवा. लोकसंख्या वाढीचे चांगले व वाईट दोन्ही परिणाम आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून अभ्यासायला हवेत. भारतातील लोकसंख्याविषयक धोरणे आणि त्यांतील महत्त्वाच्या तरतुदी समजून घ्यायला हव्यात. याबाबत direct तरतुदी, उद्दिष्टे विचारली जाऊ शकतात.

आनुषंगिक अभ्यास     

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व २०११च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्यांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेले जिल्हे आणि सर्वाधिक व सर्वात कमी वाढीचे जिल्हे अशा पद्धतीने कोष्टकामध्ये नोंदी करून अभ्यास करणे फायदेशीर ठरेल.

राज्यातील जिल्ह्यंच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यंच्या राजधान्या व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्यंच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी /  डोंगर /  नैसर्गिक भूरूप या बाबी आधीच्या अभ्यासक्रमामध्येही वेगळ्याने नमूद केलेल्या नव्हत्या तरी त्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे आताही राज्याचा राजकीय नकाशासुद्धा व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

पेपर तीनमधील मानवी हक्क /  संसाधने किंवा पेपर चारमधील अर्थशास्त्राचा भाग म्हणूनही विचारले जाणारे काही जागतिक व राष्ट्रीय निर्देशांक व त्यातील भारताचे व त्याच्या शेजारी देशांचे स्थान या बाबींची माहिती अद्ययावत करून घ्यायला हवी.