शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ सालापर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून विविध योजना, उपक्रम घोषित करण्यात आले आहेत. यातील गटशेती योजनेह्णबाबतच्या परीक्षोपयोगी मुद्दय़ांवर या लेखामध्ये चर्चा करूया.

एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिक शेती करणे, शेती उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे. एकत्रित विपणनासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे आणि या सर्व माध्यमांतून आपल्या गटसमूहाचा विकास घडवून आणणे म्हणजे गटशेती किंवा अथवा समूह शेती.

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ सालापर्यंत दुप्पट करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचसाठी तिचे सबलीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सन २०१७-१८आणि २०१८-१९ या दोन वित्तीय वर्षांत अंमलबजावणी करण्यासाठी पथदर्शी योजना आखण्यात आली आहे. या योजनेतील ठळक तरतुदी पुढीलप्रमाणे –

*      महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अथवा कंपनी नोंदणी अधिनियम १९५६ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे

*      दोन वर्षांत या योजनेअंतर्गत प्रत्येक गटास जास्तीतजास्त एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

*      प्रतिवर्षी २०० शेतकरी गटांना त्यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.

*      पीक पद्धती व शेतीचा प्रकल्प विचारात घेऊन गटशेतीसाठी आदर्श नमुना प्रकल्प मॉडेल तयार करण्यात येईल.

*      यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग व रेशीम उद्योग आदी विभागांच्या आदर्श नमुना प्रकल्पाचा समावेश करण्यात येईल.

*      या योजनेत शेती अवजारे, बँकेचा समावेशही करण्यात आला आहे.

*      गटातील सदस्यांची संख्या वाढण्यासह या सदस्यांचे एकूण क्षेत्र १०० एकरांच्या पटीत वाढले तर वाढीव असलेल्या प्रत्येकी १०० एकरांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचे वाढीव अनुदान देय राहणार आहे.

*      या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व पुरस्कारास पात्र ठरलेल्या शेतकरी गटांना प्रथम (२५ लाख), द्वितीय (१५ लाख), तृतीय (५ लाख) याप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.

सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे शेतकऱ्यांची वैयक्तिक जमीन धारणा कमी होत गेल्याने शेती व्यवसायाच्या निविष्टी आणि उत्पादन यांचे संतुलन साधणे आणि फायदेशीर उत्पन्न मिळविणे त्याच्यासाठी अवघड होत जाते. समूह/ गटशेतीच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा आकार वाढवणे आणि निविष्टी एकत्र करून उत्पादन घेणे हा उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो, हे अन्य देशांतील शेतीक्षेत्राच्या अनुभवावरून लक्षात येते.

समूह शेतीचे फायदे

* समूह शेतीमुळे उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर होण्यास मदत होणार आहे.

* सामूहिकरीत्या शेतीमालाची विक्री केल्याने उत्पादन व वाहतूक खर्चात बचत होऊन फायदा वाढणार आहे.

* काही कृषी मालांवर काढणीपश्चात प्रक्रिया करणे शक्य होणार असल्याने शेतमालास योग्य भाव मिळणे शक्य होऊ शकेल.

* समूह शेतीतून मोठय़ा प्रामणावर भांडवल व उत्पादन होणार असल्याने शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे शक्य होणार आहे.

* सामूहिक शेतीमुळे पशुपालन, रेशीम व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, रोपवाटिका, मधुमक्षिकापालन आदि शेतीपूरक जोडधंदे करणे शक्य होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे.

पाश्र्वभूमी

लोकसंख्या वाढीमुळे शेतजमिनीचे सातत्याने विभाजन होत असून तिची धारणक्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सन २०१०-११च्या अहवालानुसार महाराष्ट्रात १९७०-७१ मध्ये असलेली ४.२८ हेक्टरची धारणक्षमता कमी होत जाऊन ती सन २०१०-११ मध्ये १.४४ हेक्टर प्रति खातेदार इतकी कमी झाली आहे. काही ठिकाणी तर ती ११ ते १५ गुंठे इतक्या कमी प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत एवढय़ा छोटय़ा क्षेत्रावर शेती करणे आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरत नसल्याचे आढळून आले आहे. या समस्येवर समूह शेती हा प्रभावी उपाय आहे.