चीनसोबतच्या संबंधांवरुन भारतानं नेपाळला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नेपाळने आशियातील श्रीलंकेसह अन्य देशांकडून शिकायला हवं आणि चीनपासून सावध रहायला हवं, असं भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सीडीएस रावत म्हणाले, “भारताची सद्भावना कोणत्याही धाग्याने जोडलेली नाही. नेपाळ आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये स्वतंत्ररित्या कार्य करु शकतो. तसेच नेपाळला श्रीलंका आणि अन्य देशांकडून शिकलं पाहिजे तसेच चीनपासून सावध राहिलं पाहिजे.”

आणखी वाचा- ‘गलवान खोऱ्यात जे घडलं, त्यानंतर…’; लष्करी कमांडरने सांगितली वस्तुस्थिती

गेल्या दोन महिन्यांमध्ये नवी दिल्ली ते काठमांडू दरम्यान एकामागून एक अशा तीन उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीडीएस रावत यांनी नेपाळला हा इशारा दिला आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला आणि रिसर्च अँड अॅनेलेसिस विंगचे (रॉ) प्रमुख समंतकुमार गोयल हे या दौऱ्यात सहभागी होते.

चीन सातत्याने आपली सैन्य आणि आर्थिक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी चीनकडून अब्जावधी रुपयांचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हिमालयन रिजनमध्ये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचंही यावर लक्ष असून भूतान आणि बांगलादेशचं सहकार्य मिळवत आहे. याला बांगलादेश-भुतान-भारत-नेपाळ (बीबीआयएन) सहकार्य असे संबोधले जात आहे.