राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाजपाचे अत्यंत बारीक लक्ष आहे. पण भाजपाने यावर अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही. काँग्रेसकडून सातत्याने भाजपावर सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला जात आहे. पण भाजपाने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याला काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष जबाबदार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने आज सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन दूर केले.

“सध्या आम्ही कुठलीही मागणी करणार नाही. हे भ्रष्ट सरकार आहे. करोना व्हायरसची स्थिती सुद्धा या सरकारला हाताळता आलेली नाही. हे कमकुवत सरकार आहे. लोकांच्या हिताच्या दृष्टीने हे सरकार गेले पाहिजे” असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले.

सरकारजवळ बहुमताचा आकडा नाहीय, याची खात्री होत नाही, तो पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार नाही असे दिल्लीतील भाजपा नेत्यांनी सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. मंगळवारी अशोक गेहलोत यांनी त्यांच्याजवळ १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १०१ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे ७२ आमदार आहेत. त्याशिवाय त्यांना आरएलपीच्या तीन आमदारांचा पाठिंबा आहे.