पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवारी ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओडिशाच्या बालासोर य़ेथे याची चाचणी घेण्यात आली.

शौर्य क्षेपणास्त्राच्या या नव्या आवृत्तीच्या माध्यमातून ८०० किमी दूरवर निशाणा लावला जाऊ शकतो. या क्षेपणास्त्रामुळं भारताची सध्याची क्षेपणास्त्र व्यवस्था अधिक बळकट होईल. हे क्षेपणास्त्र संचलित करण्यास हलकं आणि सोपं आहे, असं लष्कराच्या सुत्रांनी म्हटलं आहे.

यापूर्वी बुधवारी भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र ४०० किमी पर्यंतच्या अंतरावरील टार्गेट उध्वस्त करु शकतं. डीआरडीओने ओडिशाच्या बालासोरमध्ये जमिनीवरुन पीजे-१० प्रकल्पांतर्गत या क्षेपणास्त्राची चाचणी केली, या क्षेपणास्त्राला स्वदेशी बूस्टरसोबत लॉन्च करण्यात आले होते.