जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे. सैन्यातील एका जवान या चकमकीत शहीद झाला.

पुलवामा येथील सिरनू या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार शनिवारी पहाटे चारच्या पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या भागात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.  या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर सैन्यातीन दोन जवान या चकमकीत जखमी झाले होते. यातील एका जवानाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी बारामुल्लामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले होते. भारताच्या सुरक्षा दलांनी या वर्षभरात २३० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.