CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात आपण कोणतंही चुकीचं पाऊल उचललेलं नाही. जे केलं ते योग्य आणि देशहिताचं आहे. आपल्याला यासाठी फ्रंटफूटवरच राहिलं पाहिजे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDA च्या बैठकीत केलं आहे. आपण बचावात्मक पवित्रा घेण्याची काहीही गरज नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. या देशाचे मुसलमान हेदेखील तेवढेच आपले आहेत जेवढी इतर जनता असंही मोदींनी म्हटलं आहे. दिल्लीत NDA ची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही भूमिका मांडली.

NDA च्या बैठकीत सर्व सहमतीने एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सगळ्यांनी म्हटलं आहे. तसंच NDA त्यांच्या मागे एखाद्या पहाडाप्रमाणे उभी आहे असंही सांगण्यात आलं. हा प्रस्ताव रामविलास पासवान यांनी सादर केला. प्रस्तावात अनुच्छेद ३७०, CAA, कर्तारपूर कॉरिडॉर याबाबतचे उल्लेख होते.

सुधारित नागरिकत्व कायद्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपाने जनसंपर्क अभियान सुरु केलं आहे. देशभरातले भाजपाचे नेते लोकांना हे समजावून सांगत आहेत की हा नागरिकता हिसकावण्याचा नाही तर देण्यासंदर्भातला कायदा आहे. मात्र CAA, NCR आणि NPR ला विरोध होतो आहे. मात्र आपण हा कायदा लागू करुन काहीही चुकीचं केलं नाही असं मोदींनी म्हटलं आहे.