देशात निर्माण झालेल्या आर्थिक गर्तेतून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. त्यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार असल्याचं वृत्त आहे. या वृत्तानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे.
केंद्र सरकारनं सार्वजनिक कंपन्यांतील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटाच सुरू केल्याचं दिसत आहे. एअर इंडियासह बँकिंग क्षेत्रातील काही बँकांचं खासगीकरण केलं जाणार असतानाच आता आणखी २६ सार्वजनिक कंपन्यांमधील भागीदारी सरकार विकणार आहे. यात एलआयसीतील काही हिस्सा विकणार असल्याचं समजतं. केंद्राच्या या निर्गुंतवणुकीच्या धोरणावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
“मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून एलआयसीला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
मोदी जी ‘सरकारी कंपनी बेचो’ मुहीम चला रहे हैं।
खुद की बनायी आर्थिक बेहाली की भरपाई के लिए देश की सम्पत्ति को थोड़ा-थोड़ा करके बेचा जा रहा है।जनता के भविष्य और भरोसे को ताक पे रखकर LIC को बेचना मोदी सरकार का एक और शर्मनाक प्रयास है। pic.twitter.com/W4OjDJ1nY7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 8, 2020
निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर देत सरकारनं आधीच काही सार्वजनिक कंपन्यातीली हिस्सेदारी विकली आहे. आता आणखी २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली आहे. या निर्णयावरून काँग्रेसनं मोदींना लक्ष्य केलं आहे.