पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मागील तीन परिषदांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना दिल्या जाणाऱ्या मदतीची घोषणा केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी रविवारी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दल सांगितले. डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार आहेत. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायदाचं होईल असं त्या म्हणाल्या.

चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.

निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजमधून गरिबांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. सीतारामन म्हणाल्या,”करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि गरिबांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारन मागील दोन महिन्यांच्या काळात अनेक उपाययोजना केल्या. गरिबांना, स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत ही मदत करण्यात आली. तंत्रज्ञानामुळे गरिबांना तातडीनं थेट मदत करता आली. आतापर्यत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजनातंर्गत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ कोटी गरीब, मजुरांना गहु, तांदूळ मोफत वाटप करण्यात आलं, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.