गेल्या २० वर्षात देशभरात सर्पदंशाने १२ लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. सर्पदंश मृत्युची नोंद योग्य रितीने होत नसल्याने सरकारी आकडेवारीशी याची तुलना केल्यास मोठी तफावत दिसून येते. त्यामुळेच सर्पदंश मृत्युबाबतचे दुर्लक्ष या शोधनिबंधाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. टोरँटो विद्यापीठातील जागतिक आरोग्य संशोधन केंद्र आणि त्यांच्या भारतीय सहभागींच्या माध्यमातून तयार झालेला शोध निबंध नुकताच ई-लाईफ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला. ‘दशलक्ष मृत्यु अभ्यास’ या २०११ साली झालेल्या अभ्यासातून वर्षाला ४६ हजार मृत्यू सर्पदंशाने होत असल्याचा निष्कर्ष मांडला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने उष्णकटीबंधीय प्रदेशातील दुर्लक्षित आजारांमध्ये सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्या प्रकरणांना प्राधान्य दिले होते. त्यानंतर २०३० पर्यंत यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष कार्यक्रम संघटनेने आखला होता. आता या नव्या शोधनिबंधामुळे सर्पदंश मृत्युबाबत देशात अद्यापही फारसे गांभीर्य नसल्याचे अधोरेखित होते आहे. शोधनिबंधनानुसार सर्पदंशाने मृत्यूची ७० टक्के प्रकरणे ही कमी उंचीवरील प्रदेशात म्हणजेच बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तरप्रदेश, आंध्रपदेश, तेलंगणा, राजस्थान आणि गुजरात या राज्यात नोंदवण्यात आली आहेत. तर यातील पन्नास टक्के मृत्यू हे शेतीच्या कामादरम्यान जून ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीत झाले असून, घोणस हा साप त्यास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. ‘दशलक्ष मृत्यु अभ्यासा’ची व्याप्ती वाढवत त्याच जोडीने ७८ विविध अभ्यासांचा आधार घेऊन हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. सरकारी रुग्णालयातील सर्पदंशमृत्यू नोंदविण्याचे प्रमाण हे प्रत्यक्ष परिसरातील अभ्यासातून आढळलेल्या मृत्युंपेक्षा केवळ एक दशांश असल्याचे दिसून येते. ही त्रुटी टाळण्यासाठी सर्पदंश हा नोंदविला जाणारा ‘उल्लेखनिय आजार’ (नोटीफायेबल डिजिस) म्हणून घोषित करुन एकात्मिक आजार पाळत कार्यक्रमांतर्गत त्याची नोंद व्हावी. कारण अशा मृत्युंची योग्य नोंदणी नसल्यानेच हे रोखण्यासाठी सरकारी पातळीवरुन नियंत्रणासाठी योजना आखल्या जात नसल्याचे या शोधनिबंधामुळे पुन्हा एकदा सिद्ध होते आहे. "साप हे आपल्या परिसंस्थेत नियंत्रकाची भूमिका बजावतो. सर्पदंश मृत्युंचे प्रमाण आणि त्याच्या भूभागाची व्याप्ती मर्यादित क्षेत्रात अधिक आहे. तसेच वर्षभरातील कालावधीदेखील बहुतांशपणे निश्चित आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, पण त्यासाठी तातडीने उपाययोजनांची सुरुवात करण्याची गरज आहे", असे मत सरीसृप प्राणी तज्ज्ञ रोमुलस व्हीटेकर यांनी व्यक्त केले आहे.