Stampede at Bengaluru stadium: रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आयपीएल स्पर्धेत मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दररोज याबद्दल नवीन माहिती समोर येताना पाहायला मिळत आहे. आता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सरकारला पत्र लिहून गर्दीच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि विधान सौधा (Vidhana Soudha) येथे साजरा केल्याजाणाऱ्या विजयाच्या उत्सवावर आक्षेप घेतला होता ही बाब समोर आली आहे.
डीसीपी (विधान सौधा सुरक्षा) एम. एन. करिबासवन गौडा यांनी ४ जून २०२५ रोजी डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अँड अॅडमिनिस्ट्रेटीव्ह रिफॉर्म (DPAR)च्या सरकारी सचिवांना पत्र लिहून यासंबंधीच्या धोक्यांबद्दल चेतावणी दिली होती. गौडा यांनी १० मुद्द्यांच्या आधारे सुरक्षा आणि महत्त्वाच्या इमारतींची व्यवस्था लावण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यांना असलेला धोका याबद्दलचा उल्लेख या पत्रात केला होता.
द इंडियन एक्सप्रेसने पोलीस खात्यामधील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा विधान सौधाच्या पायऱ्यांवर आयोजित करण्याबाबत डीपीएआरकडून मत विचारण्यात आल्यानंतर त्यांनी (डीसीपींनी) हे पत्र लिहिले होते.
४ जून रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेच्या बाजूला झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला, हे सर्व लोक आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी आयोजित केलेल्या सोहळ्यासाठी एकत्र जमले होते.
“विधान सौधा येथे लाखो क्रिकेट चाहते येण्याची शक्यता आहे. सुरक्षा कर्मचार्यांची कमतरता असल्याने बंदोबस्त ठेवणे कठीण जाईल,” असे गौडा यांनी डीपीएआरच्या सचिव जी सत्यवती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
गौडा यांनी लिहीलेल्या पत्रात कार्यक्रमाच्या ठिकाणाची संवेदनशील स्थिती आणि अपुरे सीसीटीव्ही कव्हरेज हे देखील चिंता असल्याचेही नमूद करण्यात आले होते. इतके स्पष्ट इशारे देऊनही विजयोत्सवाचा कार्यक्रम नियोजित ठिकाणीच घेण्यात आला.
चेंगराचेंगरी होण्याच्या काही तास आधी, सत्यवती यांनी वाढत असलेली गर्दी पाहून चाहत्यांना विधान सौधा येथे येण्याऐवजी स्टेडियममध्ये जावे असे जाहीर अवाहन केले. स्टेडिएममध्ये उत्सव साजरा करण्यापूर्वी विधान सौधा येथे संघााच सत्कार करण्यात आला.