लोकसभेत मोदी सरकार विरोधात आणल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु झाली आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. मोदी सरकार विरोधात आणण्यात आलेल्या या अविश्वास ठरावात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातल्या खासदारांची भाषणं होतील. गुरुवारी दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देतील आणि त्यानंतर मतदान होईल. आज निशिकांत दुबे यांनी बोलत असताना राहुल गांधींवर टीका तर केलीच पण आप करे तो रासलीला, हम करें तो कॅरेक्टर ढिला? असं म्हणत विरोधातल्या पक्षांपुढेही काही प्रश्न उपस्थित केले. काय म्हटलं आहे निशिकांत दुबेंनी? राष्ट्रवाद आणि मणिपूरबाबत तुम्ही बोलत आहात? आसाममध्ये १९८३ मध्ये काय घडलं होतं? किती लोक मारले गेले होते? मिझोरममध्ये सात टक्के मतांवर सरकार तयार केलं होतं. जरा इतिहासात डोकवून पाहा. राहुल गांधी सदनात आले इतका हंगामा झाला की काय घडलं. राहुल गांधी कुठे गेले होते? आम्ही सगळे बजेट अधिवेशनात आले होते. आता पावसाळी अधिवेशनात आपण चर्चा करतो आहोत आता राहुल गांधी सदनात आहेत ना? मग एवढी चर्चा का करता आहात? ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटवर राहुल गांधी आले त्या न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन आहेत असं म्हणत आहेत. आता माफी मागणार नाही म्हणता. मोदींची जात तुमच्या जातीत फरक आहे तुम्ही माफी नाही मागणार. दुसरी बाब तुम्ही सांगता मी सावरकर नाही. मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही सावरकर होऊही शकत नाही. २८ वर्षे ज्या महान माणसाने तुरुंगात घालवले त्यांच्याशी तुलना करु नका. इंडियाचा फुलफॉर्म माहित आहे का? I.N.D.I.A ही आघाडी तयार करण्यात आली आहे. इथे जे खासदार बसलेत त्यांच्यापैकी एकाला विचारा की याचा फुलफॉर्म काय? आता इंडिया इंडियाचे नारे देत आहेत.अध्यक्ष महोदय आत्ता तुम्ही ज्या दानिश अलींना समज दिलीत त्यांना भारतमाता की जय म्हटलं तरीही वाटतं की हा भाजपाचा नारा आहे. आपले पंतप्रधान सांगतात की हा अविश्वास प्रस्ताव नाही तर विरोधकांबरोबर कोण कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रस्ताव आहे. मी यावर विचार केला आणि काही निष्कर्ष काढले. सर्वात मोठा पक्ष डीएमके आहे. करुणानिधी यांचा हा पक्ष. १९९६ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करुन काँग्रेसने करुणानिधींचं सरकार घालवलं. १९८० मध्ये इंदिरा गांधींचं सरकार होतं तेव्हा डीएमके त्यांच्या बरोबर होतं. आप करे तो रासलिला हम करे तो कॅरेक्टर ढिला असं कसं काय चालेल. राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर दोन कमिशन तयार झाले एक होतं बर्मा कमिशन दुसरं होतं जैन कमिशन. जैन कमिशनने हा अहवाल दिला होता की लिट्टेला डीएमकेने सहकार्य केलं होतं. मग जैन कमिशनचा अहवाल चुकीचा होता का? दयानिधी मारन, कनिमोळी यांच्याविरोधात टू जी घोटाळ्याचे आरोप केले? दुसरा मोठा पक्ष आहे टीएमसी. सिंगूरचं आंदोलन झालं, त्यावेळी भाजपाने साथ दिली. ममता बॅनर्जींच्या रॅलीत राजनाथ सिंह सहभागी झाले होते. नारदाची केस तुमच्यावर कुणी केली? काँग्रेसने केली. तिसरा पक्ष आहे आरजेडी. लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात कुणी पाठवलं? आँख का अंधा नाम नैनसुख अशी या इंडियाची अवस्था आहे. आमचा विरोध कशासाठी का करत आहेत? चौथा पक्ष आहे मुलायम सिंह यादव यांचा समाजवादी पक्ष. त्यांची इमेज कुणी खराब केली? काँग्रेस कार्यकर्ते विश्वनाथ सिंह यांनी केस केली. २००८ मध्ये सीबीआयच्या भीतीने तुम्हाला पाठिंबा दिला की त्यांना वाटत होतं म्हणून पाठिंबा दिला हे जरा खरं बोला. परवा सुप्रिया सुळेही बोलल्या की आमच्या पक्षाला नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हटलं गेलं. होय आम्ही म्हणालो पण आता मला विचारायचं आहे १९८० मध्ये शरद पवारांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? काँग्रेसने केलं. कोणता मुद्दा पुढे घेऊन शरद पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केला सगळ्यांनाच माहित आहे असंही निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.