अनेक देशांनी कोविड-19 विरुद्ध बूस्टर शॉट्ससह असुरक्षित लोकसंख्येचे लसीकरण सुरू केल्यानंतर, कोवॅक्सिन उत्पादक- भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा एला म्हणाले की, कोविडविरोधी लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस घेणं योग्य ठरेल. मात्र, अंतिम निर्णय सरकारचा आहे, असेही ते म्हणाले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एला पुढे म्हणाले की आतापर्यंत, सरकार आणि काही तज्ञांचे मत आहे की बूस्टर डोस तातडीने गरजेचा ​​नाही आणि दोन डोससह संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करणे हे प्राधान्य आहे. Covaxin साठी जागतिक आरोग्य संघटनकडून मंजुरी मिळण्यास विलंब होण्यामागे एला यांनी भारतातील लसी विरोधातल्या “नकारात्मक” दृष्टीकोनाला जबाबदार धरलं. त्यांनी यामागे राजकारण असण्याची शक्यता बोलून दाखवली. तसंच ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीच्या क्षमतेवर तसंच भारतीय विज्ञान आणि नवकल्पनेवर विश्वास ठेवून कोवॅक्सिन लस घेतली त्यावेळी या लसीला भाजपा लस किंवा मोदी लस असंही संबोधण्यात आलं.

एला यांनी सूचित केले की भारत बायोटेकने विकसित केलेली नाकातील कोविड लस कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या बदल्यात किंवा पूर्वी संक्रमित व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी घेतली जाऊ शकते. त्यांनी पुढे नमूद केले की वरच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नसलेल्या इंजेक्शनच्या लसीच्या तुलनेत विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नाकातील लस अधिक प्रभावी आहे.