आरसीबीने १८ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला. आज त्यांची विजयी परेड निघाली. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत जवळपास १५ जण जखमी झाले आहेत, चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली आहे. ही घटना नेमकी कशी घडली? काय काय घडलं? ते आपण जाणून घेऊ.

RCB चा जल्लोष पाहण्यासाठी लोकांची गर्दी

RCB चा विजयी जल्लोष चिन्नास्वामी स्टेडियमवर अनुभवण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. याचवेळी जी चेंगराचेंगरी झाली त्यात ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. आयपीएल मध्ये झालेल्या विजयाचं सेलिब्रेशन मैदानावर सुरु असतानाच ही घटना घडली आणि सगळं वातावरणच शोकात बुडाल्याप्रमाणे झालं. या ठिकाणी नियोजनातील ढिसाळपणा पूर्णपणे दिसून आला. मैदानात सेलिब्रेशनला उपस्थित राहण्यासाठी फ्री पासेस मिळलीत अशा गोंधळातून गर्दी जमा झाली आणि चेंगराचेंगरीत ११ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले.

१८ वर्षांनी आरसीबीचा विजय झाल्याने सेलिब्रेशन

आयपीएलच्या अंतिम सामन्यात ३ जून रोजी आरसीबीचा विजय झाला. आरसीबीला १८ वर्षांनी हा विजय मिळाल्याने कर्नाटकातील बंगळुरु या ठिकाणी रस्त्यांवर ३ जूनच्या रात्रीपासूनच सेलिब्रेशन सुरु झालं होतं. एमजी रोड, चर्च रोड आणि इतर भागांमध्ये लोकांनी ३ जूनच्या रात्रीही मोठ्या प्रमाणावर गर्दी करत जल्लोष साजरा केला. टीम परत आल्यानंतर विधान सौधा या ठिकाणापासून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत व्हिक्टरी परेड निघेल हे सांगण्यात आलं. यासाठी काही मर्यादित फ्री पासेसही होते. मात्र त्याबाबत गोंधळ उडाला नीटशी माहिती दिली गेली नाही. ज्यामुळे गर्दीचे घोळकेच्या घोळके मैदानाच्या दिशेने येऊ लागले. काही वेळातच या गर्दीचं रुपांतर अलोट गर्दीत झालं, ज्यानंतर चेंगराचेंगरी झाली. आज सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी व्हिक्टरी परेड होणार नाही असं बंगळुरुतील वाहतूक विभागाने जाहीर केलं. दुपारी १.३० च्या सुमारास हजारो लोक विधान सौधा भागात जमले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या या ठिकाणी आरसीबीच्या टीमचा सत्कार करणार होते. मात्र गर्दी प्रचंड प्रमाणात झाली होती.

गर्दी नेमकी कशी वाढत गेली?

काही लोक झाडांवर चढून बसले. काहींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या इमारतीत जाण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे बघता बघता गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली. या ठिकाणी गर्दी झाल्याने या भागात थांबणाऱ्या मेट्रोनेही मेट्रो या भागात थांबणार नाही असं जाहीर केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३ च्या सुमारास १ किमीच्या परिसरात साधारण ५० हजार लोक जमा झाले होते. अनेकांकडे व्हिक्टरी परेडची तिकिटं होती, बहुतांश गर्दीकडे ही तिकिटं नव्हती. फ्री तिकिटं मिळतील यासाठी ते आले होते. आपल्या आवडत्या क्रिकेटर्सनला आणि खास करुन विराट कोहलीला डोळे भरुन बघावं ही या सगळ्यांचीच इच्छा होती. मात्र प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

RCB Victory Parade 10 persons have been injured and one is said to be critical as stampede-like situation
आरसीबी विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू (फोटो-X)

संध्याकाळी पावणेपाचच्या नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरी संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुरु झाली. चिन्नास्वामी स्टेडियम तिकिटधारकांसाठी खुलं होतं. अशात गेट क्रमांक १ उघडलं गेलं आणि फ्री येणाऱ्यांना तिथून प्रवेश देण्यास सुरुवात झाली ज्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. महेश, इनयानाथ या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार प्रत्येकजण त्या गेटच्या दिशेने धावत जाऊ लागले. अलोट गर्दी एकाच दिशेने धावली. सुरुवातीला तीन मुली खाली पडल्या आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?

“चिन्नास्वामी स्टेडियम या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. साधारण तीन लाख लोक विधान सौधा भागात जमा झाले होते. मैदानाची क्षमता ३५ हजार इतकीच आहे. आम्हाला वाटलं होतं की साधारण या संख्येहून काही जास्त लोक येतील. ज्या ११ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यापैकी बरेच तरुण-तरुणी आहेत.” असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर

चिन्नास्वामी स्टेडियम येथील चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही १० लाखांची मदत जाहीर करत आहोत. अशीही घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. तसंच घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच या घटनेची चौकशी समिती नेमून केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.