दहशतवाद्यांना आणि दहशतवादी कारवायांना उत्तर देण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरस आहेत असं वक्तव्य दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी केलं आहे. २६/११ चा हल्ला जेव्हा मुंबईवर झाला त्यावेळी मनमोहन सरकारने तेवढी कठोर कारवाई केली नाही जेवढी पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर दिले, असं म्हणत शीला दीक्षित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली असली तरीही मोदींनी या कारवाईचं राजकारण केल्याचीही टीका त्यांनी केली. Sheila Dikshit, Congress on her reported comment 'Manmohan Singh's response to terror not as strong as Narendra Modi's: If something is taken out of context, I can't say. pic.twitter.com/uecycyqdy0 — ANI (@ANI) March 14, 2019 एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शीला दीक्षित यांनी हे उत्तर दिले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे हल्ला केला. ज्यानंतर ४० जवान शहीद झाले. यानंतर बालाकोट या ठिकाणी एअर स्ट्राईक करून वायुसेनेने जैशचे तळ आणि दहशतवादी ठार केले. याच संदर्भात शीला दीक्षित यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी होय मोदींचे उत्तर जास्त प्रभावी आणि सरस होते. मात्र मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा २६/११ च्या हल्ल्यानंतर इतके प्रभावी उत्तर देऊ शकले नाहीत असे म्हटले आहे. मात्र वायुसेनेने केलेल्या कारवाईचे राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत अशी टीकाही शीला दीक्षित यांनी केली. शीला दीक्षित यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. कारण यूपीएच्याच पंतप्रधानांच्या विरोधात जाणारं हे त्यांचं वक्तव्य आहे.