देशभरच्या सहाशे चित्रपट कलावंत- चित्रपटकार व लेखकांनी निवडणुकीसंदर्भात केलेल्या आवाहनावर सत्ताधारी पक्ष व समर्थकांकडून शाब्दिक हल्ला चढविला जात असतानाच, मराठी साहित्यिकांनीही निराळे पत्रक काढून मतदारांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन केले आहे.
‘जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बगल देऊन राष्ट्रवादाचा फुगा फुगविण्यामागचे राजकारण जाणून घेऊ या, आणि अशा शक्तींना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊया’ अशा शब्दांतील आवाहन या पत्रकात असले, तरी त्यात नरेंद्र मोदी अथवा भाजपचा थेट उल्लेख नाही. तरीही, ‘दुसऱ्या धर्माबद्दल, दुसऱ्या जातीबद्दल, दुसऱ्या माणसांबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत ते ओळखूया, अशा द्वेषभावनांना पोसणारे आणि हिंसक कृत्ये करून समाजात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांना अभय देणारे राजकारणी कोण आहेत ते ओळखूया’ अशा शब्दांत, दादरी हत्याकांडापासून ते भीमा-कोरेगावपर्यंतच्या अनेक घटनांची आठवण हे पत्रक देते. ‘या वाढत्या समाजविघातक प्रवृत्तीचा केवळ निषेध करून भागणार नाही तर ठोस कृती करून तिचा निपटारा करण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. अशी कृती करण्याची संधी आपल्याला सार्वत्रिक निवडणुकांच्या रूपाने राज्यघटनेने उपलब्ध करून दिलेली आहे,’ अशी या पत्रकामागील भूमिका आहे.
भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे, सतीश आळेकर, रामदास भटकळ, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, श्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, मिलिंद मालशे, नागनाथ कोत्तापल्ले, हरिश्चंद्र थोरात, शांता गोखले आदी ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षकांच्या सहमतीने, तसेच त्यापुढल्या फळीतील मकरंद साठे, मुकुंद टांकसाळे, अशोक बागवे, प्रवीण दशरथ बांदेकर, राजीव नाईक, हेमंत कर्णिक, शफाअत खान, प्रदीप चंपानेरकर, प्रेमानंद गज्वी, अजय कांडर, नीरजा, प्रज्ञा दया पवार, हेमंत दिवटे, रवींद्र लाखे, महेश केळूसकर आदींच्या साथीने हे पत्रक प्रसृत करण्यात आले आहे. एकंदर १०५ साहित्यिकांनी मिळून केलेले हे आवाहन असून, त्यात नव्या पिढीचे मानले जाणारे प्रणव सखदेव, धर्मकीर्ती सुमंत, मनस्विनी लता रवींद्र, अवधूत डोंगरे यांचाही समावेश आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार-नाटककार जयंत पवार हे या प्रक्रियेला चालना देणाऱ्यांपैकी एक. ते म्हणाले ‘ज्यांची सहमती स्पष्टपणे दिसली नाही, त्यांचा समावेश या नावांत दिसणार नाही.