राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (NRC) मुद्दा हा आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही. मात्र, ही बाब जाहीर करण्याची केवळ भाजपा सरकारनेच हिंमत दाखवली आहे. या प्रक्रियेची सुरुवात १९५१मध्येच झाली होती. मात्र, यावर पुढे काम झालेच नाही, असे भाजपाचे महासचिव राम माधव यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भाजपा सध्या २०१९च्या तयारीत असून विरोधकांकडून आम्हाला प्रत्येक मुद्द्यावरुन घेरण्यात येत असले तरी देशातील जनता आम्हालाच साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते न्यूज १८च्या कार्यक्रमात बोलत होते.

माधव म्हणाले, सध्या या यादीत नावे समाविष्ट नसलेल्या ४० लाख लोकांना घुसखोर मानण्यात येणार नाही. कारण अजूनही त्यांच्याजवळ सप्टेंबर अखेरपर्यंत स्वतःला देशाचे नागरिक असल्याचे सिद्ध करण्याची संधी आहे. त्यानंतर जेव्हा अंतिम अहवाल येईल तोपर्यंत जे लोक आपली नागरिकता सिद्ध करु शकणार नाहीत, त्यांना घुसखोर म्हणून घोषित करण्यात येईल.

एनआरसीचा मुद्दा उपस्थित करुन भाजपा आपला मुळ राम मंदिराचा मुद्दा विसरली आहे का? या प्रश्नावर राम माधव म्हणाले, प्रत्येक गोष्टीची वेळ येते. त्यानुसार, सध्या सुप्रीम कोर्टात राम मंदिराच्या मुद्द्यावर सुनावणी सुरु आहे. ज्या दिवशी यावर निर्णय येईल ती बाबही पुढे नेण्यात येईल. त्याप्रमाणे 35A कलमावरही सुप्रीम कोर्टात चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन राम मंदिर आणि काश्मीर मुद्द्यावर भाजपाचे लक्ष असल्याचे त्यांनी सूचित केले.

दरम्यान, त्यांनी जम्मू-काश्मीरमधील महबूबा मुफ्ती सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. ज्या दिशेला इथले सरकार जात होते त्यांच्यासोबत जाणे भाजपाला शक्य नव्हते, त्यामुळेच वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संसदेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट हा ड्रामा होता, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. तसेच जमावाकडून मारहाणीच्या घटनांविरोधात संबंधीत ठिकाणी कारवाया होत आहेत. तरीही विरोधक आरडाओरडा करतात मात्र, अशाच घटना ज्यावेळी कर्नाटक आणि केरळमध्ये घडतात त्यावर ते गप्प का असतात? असा सवालही त्यांनी केला आहे.