Sonam Raghuvanshi Arrested from UP: गेल्या दोन आठवड्यांपासून सोनम रघुवंशी व राजा रघुवंशी या दाम्पत्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ११ मे रोजी विवाहबद्ध झालेलं हे दाम्पत्य २० मे रोजी मेघालयमधील शिलाँग येथे फिरण्यासाठी रवाना झालं होतं. पण २३ मे पासून दोघेही बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे अनेक तपास पथकं त्यांचा शोध घेऊ लागली. अखेर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयमध्ये एका मोठ्या खड्ड्यात सापडला. त्यानंतर सोनम रघुवंशीचं अपहरण झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. पण सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सापडल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
रविवारी ८ जून रोजी रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनम रघुवंशीला ताब्यात घेतलं आणि तिनेच तिच्या पतीची म्हणजेच राजा रघुवंशीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला. मेघालय पोलिसांनी यासंदर्भात दावा केला असून मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीदेखील ही बाब शोधून काढल्याबाबत मेघालय पोलिसांचं कौतुक केलं आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या १० ते १५ दिवसांमधल्या घडामोडी आणि त्यानंतर सोनम रघुवंशी सापडणं याची जोरदार चर्चा रंगली आहे.
हत्या नेमकी केली कुणी?
मेघालय पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, राजा रघुवंशीची हत्या सोनमनंच भाडोत्री हल्लेखोरांना सुपारी देऊन करवून घेतली. राजा रघुवंशीच्या मृतदेहाजवळ मेघालयमधील स्थानिक धारदार दाव हे हत्यार सापडलं. यानंच राजाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, सोनमच्या वडिलांनी हे दावे फेटाळून लावत मेघालय पोलिसांवरच गुंडांशी संगनमत करून प्रकरण फिरवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सीबीआय तपासाचीही मागणी केली आहे. त्यामुळे ही हत्या खरंच सोनमनं केली का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
कशी सापडली सोनम रघुवंशी?
२ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर सोनमचं अपहरण होऊन तिला बांगलादेशला नेण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याअनुषंगानेही पोलिसांनी तपास चालू केला होता. पण सोनमचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर रविवारी ८ मे रोजी सोनमचा चुलत भाऊ गोविंद यालाच थेट सोनमचा फोन आल्यानंतर तिचा ठावठिकाणा लागला.
सोनमचे वडील देवी सिंह यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री गोविंदला सोनमचा फोन आला. आपण उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमधल्या एका ढाब्यावर असल्याचं सोनमनं गोविंदला सांगितलं. “दादा मला वाचव”, असंही तिनं गोविंदला सांगितलं. गोविंदनं सोनमला ढाब्यावरच्याच एका खोलीत थांबायला सांगितलं. त्यानंतर पोलिसांना कळवलं. त्यानुसार, पोलिसांनी सोनमला ढाब्यावरून ताब्यात घेतलं. सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास गोविंदनं सोनमचे वडील देवी सिंह यांनादेखील ही बाब सांगितली.
राजा रघुवंशीच्या भावाला सोनमवरील आरोप अमान्य
यादरम्यान, गोविंदनं मृत राजा रघुवंशीचा भाऊ विपीन रघुवंशी याला सोनम सापडल्याचं सांगितलं. आधी विपीनला गोविंदच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्यानं गोविंदला सोनमला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर गोविंदनं दुसऱ्या फोनवरून फोन करून विपीनला व्हिडीओ कॉल केला आणि सोनमचा चेहरा दाखवला.
विपीननं स्थानिक पोलिसांत यासंदर्भात चौकशी केली असता सोनमवर राजाच्या हत्येचा आरोप असल्याचं त्याला समजलं. आपल्याला यावर विश्वास नसल्याचं विपीनचं मत आहे. “हे पचवणं फार अवघड आहे. आम्हाला असं वाटत नाही की सोनमनं हे केलं असेल. स्वत: सोनम जोपर्यंत तिच्या तोंडाने हे सांगत नाही, तोपर्यंत यावर विश्वास ठेवण्याची आमची इच्छा नाही”, असं विपीन म्हणाला.
“हे अरेंज मॅरेजच होतं. पण या विवाहात ते दोघे आनंदी होते. ही त्यांचीच इच्छा होती. त्यांच्यावर लग्नासाठी कुणीही सक्ती केलेली नव्हती. लग्नाच्या खरेदीसाठी सासूबरोबर जाताना सोनम खूप आनंदी होती. शिलाँगला फिरायला जाणं ही त्या दोघांची कल्पना होती. सोनमनं राजावर यासंदर्भात कोणतीही बळजबरी केली नाही. राजाचं कुणाशीही शत्रुत्व नाही. शिवाय, त्याच्या मागावर पोलीसदेखील नव्हते”, असंही विपीननं सांगितलं आहे.